पुणे -करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह 10 मानाच्या पालख्यांना आषाढी वारी सोहळ्यास सहभागी होण्यास परवानगी दिली आहे. पंढरपूरला या पालख्या एसटीने जाणार आहे. प्रत्येक पालखीला दोन एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या यामधून 60 वारकऱ्यांना प्रवासास परवानगी दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
विधानभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये पवार यांनी माहिती दिली. पवार म्हणाले, आषाढीवारी संदर्भात गुरुवारी मंत्रिमंडळात चर्चा झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षीही करोनामुळे पालखी एसटीने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या. मागील वर्षी फक्त 20 वारकऱ्यांनाच परवानगी दिली होती. यंदा एका पालखीसोबत 60 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पालखी सोबत जाणाऱ्या वारकऱ्यांची करोना चाचणी करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
दहा मानाच्या पालख्या
1) श्री संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी), 2) श्री संत तुकाराम महाराज (देहू) 3) संत एकनाथ महाराज (पैठण), 4) संत नामदेव महाराज (पंढरपूर), 5) संत मुक्ताबाई (मुक्ताईनगर), 6) संत सोपानदेव (सासवड), 7) संत चांगदेव वटेश्वर महाराज (सासवड), 8) संत निळोबाराय (पिंपळनेर) 9) संत रुक्मिणी माता (अमरावती), 10) संत निवृत्ती महाराज (त्र्यंबकेश्वर)
देहू व आळंदी येथील पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी फक्त 100 वारकऱ्यांनाच परवानगी
उर्वरित पालखी सोहळ्यांना फक्त 50 वारकऱ्यांनाच परवानगी
वाखरीपासून पंढरपूरपर्यंत पायी वारी करण्यास परवानगी
पंढरपूर मंदिरात 24 तास नित्योपचार सुरू राहणार
श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार
वारकऱ्यांनी सहकार्य करावे : उपमुख्यमंत्री
वारकऱ्यांनी पायीवारीस परवानगी देण्याची मागणी केली होती. पायीवारी संदर्भात वारकरी यांनी करोनाचे नियम पाळले तरी पालखी जाणाऱ्या मार्गावरील गावातील भाविक उत्साहाने बाहेर येणार आहे. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक सरपंचांनी सध्याचे वातावरण बघता पायीवारीस परवानगी देऊ नका, असे सांगितले होते. करोनाचे संकट बघता सर्वांचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्यामुळे वारी संदर्भात मध्य मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. हा निर्णय नाईलाजास्तव घ्यावा लागत आहे. सर्व वारकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.