नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज सर्वसमावेशक संरक्षण भागीदारी करारासह 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात ऑनलाईन झालेल्या शिखर परिषदेदरम्यान या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
दोन्ही देशांना सैन्यदलांसाठी एकमेकांच्या तळांचा वापर करण्यास तसेच संपूर्ण संरक्षण सहकार्याचे प्रमाण वाढविणे या करारांमुळे शक्य होणार आहे. भारताने यापूर्वीच अमेरिका, फ्रान्स आणि सिंगापूर यांच्याशी असेच करार केले आहेत.
संरक्षण कराराबरोबरच दोन्ही देशांनी परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयांच्या सचिव पातळीवर 2+2 चर्चा करण्याच्या दृष्टीने परस्परांमधील संबंधांचे आधुनिकीकरण केले गेले. स्वाक्षरी झालेल्या अन्य करारांमध्ये सायबर आणि सायबर-सक्षम क्रिटिकल तंत्रज्ञान, खाण आणि खनिजे, लष्करी तंत्रज्ञान, व्यावसायिक शिक्षण आणि जलसंसाधन व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्याच्या करारांचा समावेश आहे.
दहशतवादाचा वाढता धोका, इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील सागरी सुरक्षेपुढील आव्हाने, जागतिक व्यापार संघटनेत सुधारणा आणि करोना विषाणूच्या साथीसारख्या संकटाशी सामना करण्याच्या पर्यायांबाबतही मोदी आणि मॉरिसन यांच्यात चर्चा झाली.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये “डबल टॅक्सेशन ऍव्हॉइडन्स ऍग्रीमेंट (डीटीएए) च्या माध्यमातून भारतीय कंपन्यांच्या विदेशातील उत्पन्नावर कर लावण्याच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंनी चर्चा केली आणि या प्रकरणाच्या लवकर निराकरण करण्यावर जोर दिला गेला. द्विपक्षीय व्यापक आर्थिक सहकार्य करारावर (सीईसीए) परस्पर सहकार्याने पुढे जाण्यासाठी पुन्हा काम करण्याचा निर्णय घेतला गेला. याशिवाय दहशतवादाचा धोका आणि अशांतता निर्माण करणाऱ्या घटकांच्याविरोधत सहकार्य करण्याचा निर्णयही दोन्ही नेत्यांमधील चर्चेदरम्यान घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक ठराव लवकरात लवकर करण्याची गरजही दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली.