कोलोंबो – देशातील अन्नधान्याच्या किंमती भडकल्याच्या पार्श्वभुमीवर श्रीलंकेचे अध्यक्ष गोताभाय राजपक्षे यांनी देशात आर्थिक आणीबाणी जाहीर केली आहे. विदेशी चलन आपत्तीमुळे देशातील चलनाचे प्रचंड अवमूल्यन झाल्यामुळे देशातील महागाई प्रचंड वाढली आहे.
साखर आणि तांदळासारख्या सर्वसामान्यांसाठी महत्वाच्या पदार्थांच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा अध्यादेशाखाली राजपक्षे यांनी ही आर्थिक आणीबाणी लागू केली आहे. काल मध्यरात्रीपासून ही आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे.
अत्यावश्यक सेवांसाठी सरकारने लष्कराच्या माजी जनरलला आयुक्त म्हणून नियुक्त केले आहे. व्यापाऱ्याकडील अन्नधान्याचे साठे ताब्यात घेऊन अन्नधान्याच्या किंमती नियंत्रित करण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. साखर, तांदूळ आणि भातशेती खरेदी करून सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हे अधिकारी करणार आहेत.
अध्यक्ष राजपक्षे यांच्या प्रसिद्धी विभागाच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. बाजारातील अनियमितता टाळण्यासाठी या वस्तू सरकारी हमी किंमतीवर किंवा आयात केलेल्या मालावरील सीमाशुल्क मूल्याच्या आधारावर दिल्या जातील, असे या निवेदनात म्हटले आहे.
विदेशी चलनाचे मूल्य वाढणे हे देशात गेल्या 12 महिन्यात अनेक अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती वाढण्यामागल एक प्रमुख कारण असल्याचे श्रीलंकेच्या जनगणना आणि सांख्यकी विभागाने म्हटले आहे. अन्नधान्याच्या वाढणाऱ्या या किंमतींमुळेच जुलै महिन्यातील महागाचे प्रमाण 5.7 टक्के होते. ऑगस्ट महिन्यात हेच प्रमाण वाढून 6 टक्के इतके झाले होते.
श्रीलंकेची बहुतांश अन्नधान्य आणि अन्य अत्यावश्यक वस्तूंची आयातच केली जाते. तिथे गेल्या वर्षभरापासून कोविड-19 ची साथ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही खूप जास्त आहे. त्यामुळेच श्रीलंकेतील महत्वाच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या व्यवसायातून मिळणारी विदेशी चलनाची गंगाजळी त्यामुळेच कमी झाली आहे.