अहमदाबाद – आशिया करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा कोणत्या देशात खेळवायची याचा निर्णय रविवारी होण्याची शक्यता आहे. आयपीएल अंतिम सामन्याच्या निमित्ताने आशियाई क्रिकेट कौन्सिलच्या सदस्यांची बैठक रविवारी होणार असल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी स्पष्ट केले आहे.
आशिया करंडक स्पर्धा कोणत्या देशात होणार याचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आशिया करंडक स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार होती; परंतु भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यास जाणार नसल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष नजम सेठी यांनी भारत आणि पाकचे साखळी सामने वेगवेगळ्या देशात खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
भारताचे सामने दुबईत तर बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान यांचे साखळी सामने पाकमध्ये खेळवण्याचा हा प्रस्ताव आहे. मात्र, अशा वेगवेगळ्या यजमानपदासाठी भारताने नकार दिला.
स्पर्धेचे ठिकाण निश्चित झालेले नसले तरी स्पर्धेचा कालावधी आणि गटवारी जय शहा यांनी अगोदरच जाहीर केली आहे. त्यानुसार 1 ते 17 सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा होणार आहे. सहा संघांच्या या स्पर्धेत भारत, पाक, नेपाळ एका गटात, तर दुसऱ्या गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.