हिंजवडी – माण-हिंजवडीमध्ये वायरमेनच्या हाताखाली हंगामी वायरमन म्हणून काम करत असलेला जनक कामगुंडा (मूळ रा. लातूर, सध्या राहणार माण, ता. मुळशी) हा इलेक्ट्रीशियन तरुण हिंजवडीतील पांडवनगर येथे विजेच्या तारांचे तांत्रिक दुरुस्तीचे काम करताना जमिनीवर कोसळून मृत्युमुखी पडला.
या दुर्घटनेत विजेच्या खांबावर काम करत असतानाच त्यास अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने (रिटर्न सप्लाय) विजेचा जोरदार धक्का लागून तो जमिनीवर खाली कोसळला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. परंतु दुर्दैवाने गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. ही घटना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी (15 ऑगस्टला) दुपारच्या सुमारास हिंजवडीतील पांडवनगर येथे घडली.
जनक हा त्याचे दाजी महावितरणचे वायरमेन तानाजी हनुमंत काकनाळे यांच्याकडे राहत होता. काकनाळे हे महावितरणमध्ये हिंजवडीतील काही भाग व माण गावासाठी वायरमन म्हणून काम करतात. विशेष म्हणजे जून महिन्यामध्ये वादळी वाऱ्याने हिंजवडीतील होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटना घडल्या. यादिवशी तानाजी काकनाळे यांचाही बोडकेवाडी फाट्यावर काम करताना विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. त्यात ते होर्डिंग्ज वरील फ्लेक्स तारांवर पडल्याने ते फ्लेक्स विजेच्या खांबावरून चडून काढत असताना अशाच पद्धतीने रिटर्न सप्लाय सुरू होऊन ते खांबावरून खाली पडल्याने त्यांचा भीषण अपघात झाला. त्यांना मोठी दुखापत होऊन त्यांच्यावर दीड महिना एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांची शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे जनक हा तानाजी यांना मदतनीस म्हणून काम करायचा. देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच जनकच्या बाबतीत ही जीवघेणी घटना घडल्याने माण गावात वायरमेन लोकांच्या जोखीमभऱ्या कामाबद्दल तसेच सुरक्षेच्या मुद्द्यांवर ग्रामस्थांमधून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मुळशीच्या भरे उपविभाग कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता अनंत घुले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, जनक हा महावितरणचा कर्मचारी नव्हता. तरीदेखील तो वायरमेनकडे मदतनीस म्हणून काम करत असताना घडलेली घटना दुर्दैवी आहे. त्याचे पोस्ट मार्टम व आमच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाचा अहवाल तसेच पोलीस पंचनामा अहवाल आल्यानंतर आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पाठवू. तसेच असे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वायरमेनने सुरक्षेसाठी दिलेली साधने वापरणे बंधनकारक केले आहे.
महावितरणला जाग केव्हा येणार
महावितरणच्या त्रुटींमुळे किंवा लाइन मेनच्या निष्काळजीपणामुळे विजेचा धक्का लागून मृत पावण्याचे तसेच गंभीर जखमी होण्याचे प्रकार यापूर्वीही हिंजवडी, माण एमआयडीसी परिसरात घडले आहेत. मात्र, महावितरणमधील वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नाहीत, असे चित्र आहे. मागच्या काही वर्षात वीजवाहक तारांचा शॉक लागून अनेक जणांना जीव गमवावा लागला आहे. परंतु जीवधोक्यात घालून काम करणाऱ्या वायरमेन लोकांना सरकार अथवा महावितरण काही सुखसुविधा पुरविणार की आणखी काही बळी जाण्याची वाट पाहणार, असा मुद्दा यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे.
केबल वाहिन्या ठरतायेत जीवघेण्या
आयटी परिसरात खासगी केबलचालकांनी आपल्या केबल थेट विजेच्या पोलवरून पास केल्या आहेत. अनेकदा या केबल वाऱ्यामुळे तुटतात किंवा विद्युत पुरवठा चालू असताना तांत्रिक बिघाड घडवितात. त्यातूनच असे अपघात घडतात. त्यामुळे विनापरवाना पोलवर केबल टाकणाऱ्या केबल कंपन्यांवर महावितरण काय कारवाई करणार, असा सवाल माणमधील नागरिक उपस्थित करत आहेत.