नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नामिबिया देशातून आणलेल्या चित्त्यांपैकी आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात याचित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यात 7 चित्त्यांचा याठिकाणी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
कुनो अभयारण्यात काल सायंकाळी 4 वर्षांच्या तेजस नावाच्या चित्त्याचा मृत्यू झाला. चित्त्याच्या मानेवर काही जखमा आढळल्या होत्या. त्यावर उपचार करण्यापूर्वीच चित्ता मृत अवस्थेत आढळून आला आहे. तेजसच्या मृत्यूमुळे आतापर्यंत कुनो अभयारण्यात 7 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. वारंवार चित्त्यांच्या मृत्यूच्या घटना घडत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
कोट्यवधी खर्च करुन आफ्रिकेतील नामिबियातून हे चित्ते आणण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून चित्ते आणले होते. आतापर्यंत कुनो अभयारण्यात 20 चित्ते आणण्यात आले होते. यातील चार चित्त्यासह तीन बछड्यांचा मृत्यू झाला आहे.
सर्वात पहिल्यांदा ‘साशा’ या मादी चित्त्याचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झालेला. तर, ‘उदय’ हा चित्ता 23 एप्रिलला निश्चल अवस्थेत आढळून आला होता. नंतर त्याचाही मृत्यू झाला. ‘दक्षा’ या मादीचा 9 मे रोजी चित्त्यांच्या झुजीनंतर मृत्यू झाला होता. आता तेजस नावाच्या चित्त्याचाही मृत्यू झाला आहे.