राहुरी – रस्ता अपघातात गंभीर जखमी झालेल्या पंकज जाधव या तरूणाला राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते पप्पू कल्हापूरे यांनी केला आहे. तसेच पंकज जाधव याच्याबरोबर असलेला सुरज आढाव हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल केले आहे.
राहुरी येथील रेल्वे स्टेशन रोड परिसरात काल सकाळी सव्वादहा वाजे दरम्यान मोटरसायकल आणि ट्रॅक्टर यांचा अपघात झाला. यावेळी मोटरसायकलवर पंकज चांगदेव जाधव (वय 19, रा. मानोरी, हल्ली रा. राजवाडा, राहुरी) हा तरूण त्याचा मित्र सुरज गणपत आढाव (वय 18 रा. मानोरी) याच्याबरोबर मोटरसायकलवर राहुरीकडे येत होता. यावेळी रेल्वे स्टेशन रोड परिसरात त्यांच्या मोटरसायकलचा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.
या अपघातात पंकज जाधव आणि सुरज आढाव या दोन्ही तरूणांना जबरदस्त मार लागला. अपघातानंतर काही लोक तातडीने अपघातस्थळी जमा झाले. त्यांनी जखमी झालेल्या दोघांना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र नेहमीप्रमाणे राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने दोघांना अहमदनगर येथील रूग्णालयात हलविले. मात्र पंकज जाधव हा तरूण रस्त्यातच मयत झाला. तर सुरज गणपत आढाव याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
पंकज जाधव या मयत तरूणाला राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात वेळेवर उपचार मिळाले नाही. त्याला अहमदनगर येथील रूग्णालयात नेण्यास उशीर लागला. या दरम्यान रस्त्यातच पंकजने आपला जीव सोडला. राहुरी शहरात सुमारे 40 ते 50 हजार लोकसंख्या आहे. एवढी लोकसंख्या असलेल्या शहरात अद्ययावत ग्रामीण रूग्णालय नाही. जे रूग्णालय आहे तेथे कोणतेही सुविधा नाही. केवळ मलमपट्टी करून रूग्णाला दुसऱ्या रूग्णालयात जाण्याचे सांगितले जाते. आजपर्यंत शेकडो लोकांना राहुरी ग्रामीण रूग्णालयात उपचार न मिळाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. राहुरी ग्रामीण रूग्णालयाचा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर लवकरच उपोषण सुरू करण्यात येईल, अशी माहिती पप्पू कल्हापूरे यांनी दिली.