मुंबई – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रेच्यावेळी बोलताना राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका केली. ते म्हणाले की, राहुल गांधी हे कोणाच्याही कामाचे नाहीत. राहुल गांधी यांची तुलना दानवे यांनी चक्क प्राण्याशी केली.
दरम्यान, त्यांच्या या विधानांवर कॉंग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी केली आहे.
रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका करताना सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांची ही विधाने असभ्य आणि धक्कादायक आहेत, असेही पटोले यांनी म्हटले आहे.
जालना जिल्ह्यात जनआशीर्वाद यात्रेच्यावेळी बोलताना दानवे यांनी राहुल गांधी यांच्यावर अत्यंत सैल जिभेने टीका केली होती.मी गेली 20 वर्षे लोकसभेत आहे, त्यांचे काम मी पाहिले आहे असेही दानवे यावेळी म्हणाले. त्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात उत्तुंग कामगिरी केल्याचा दावाही दानवे यांनी केला आहे.
दानवे यांच्या विधानांवर बोलताना नाना पटोले यांनी म्हटले आहे दानवे हे नेहमीच असे असभ्य बोलत आले आहेत. त्यांचे असे रेकॉर्ड असतानाही त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेच कसे असा सवालही पटोले यांनी केला आहे.