कौशांबी (उत्तर प्रदेश)- “राहुलबाबा, लोकशाही नाही, तुमच्या कुटुंबाला धोका आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही संपुष्टात आणली, लांगुलाचालन संपवले. म्हणूनच तुम्ही घाबरलेले आहात, अशी टिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांच्यावर केली. भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये केला होता. त्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
शहा शुक्रवारी कौशांबी दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते तीन दिवसीय कौशांबी महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक व अन्य मान्यवर उपस्थित होते. शहा बोलताना पुढे म्हणाले, परदेशात जाऊन भारताचे वाईट कोणी केले? कोणी भारतीय हे करू शकतो का? आपण सर्वांनी कायद्याचे पालन केले पाहिजे, असे सांगून शहा म्हणाले, सपा, बसपा आणि कॉंग्रेसला काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवायचे नव्हते, पण भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्या इच्छाशक्तीने हे काम सोपे झाले आणि आता तिथे शांतता आहे.
तसेच कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा इतर कोणीही पंतप्रधान मोदींना जितक्या वेळा शिव्या दिल्या, तितक्या वेळा जनतेने या शिव्यांच्या चिखलात कमळ फुलवले आहे. 2024मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होणार असून पुन्हा एकदा 300हून अधिक जागा मिळतील, असा दावाही शहांनी यावेळी केला.
कोर्टात का गेला नाहीत?
कोणतीही चर्चा न होता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले, असे इतिहासात कधीच घडले नाही. राहुल गांधी यांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाचे कामकाज चालू दिले नाही. सुरतच्या न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली. आतापर्यंत 17 खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यात राहुल गांधीही आहेत.
मात्र कॉंग्रेस नेत्यांनी काळे कपडे परिधान करून संसदेचे कामकाज रोखून धरले. मला राहुल गांधींना सांगायचे आहे की, कायद्याचे पालन करणे हा प्रत्येक नागरिकाचा धर्म आहे, तुम्ही तर खासदार होता. या शिक्षेला आव्हान देत, कोर्टात लढायचे होते. पण तुम्ही संसदेचा वेळ वाया का घालवला?, असा सवालही शहांनी उपस्थित केला.