शेतकरी, प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांकडून नैसर्गिक मार्ग गिळकृंत
थेऊर- हवेली तालुक्याच्या पूर्व भागांमधील काही शेतकऱ्यांनी व प्लॉटिंग डेव्हलपर्सधारकांनी शासकीय ओढ्यांवर अतिक्रमण केल्याने येथील शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने ओढे नाल्यांना पूर आला आहे. मात्र, ओढे नाल्यांचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळेच मानवनिर्मित ओढवलेल्या आपत्तीमुळे काही ठिकाणी लोकवस्तीमध्ये पुराचे पाणी घुसल्याने शेतीचीही वाताहात झाली आहे.
कोलवडी, केसनंद, मांजरी खुर्द, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, नायगाव, पेठ, सोरतापवाडी या भागातील सरकारी ओढ्यांना अतिक्रमणाचा विळखा घातलेला आहे. गुंठेवारीमध्ये एका गुंठ्याला साधारणपणे सात ते आठ लाख रुपये भाव मिळत असल्याने हवेलीतील डेव्हलपर्सची वक्रदृष्टी शासकीय ओढे, नाले व कॅनालचे पाट यावर पडल्याने मोठ्या पूरपरिस्थितीचा फटका हवेलीतील शेतकऱ्यांना बसला आहे. गाव नकाशातील जुने ओढे, नाले पूर्ववत करण्याची मागणी कोलवडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन भाऊसाहेब गायकवाड यांनी केली आहे.
कोलवडी, केसनंद गावच्या शिवेवरील असलेल्या सरकारी ओढ्यांवर प्लॉटिंगधारकांनी अतिक्रमण केल्यामुळे येथील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले असून बऱ्याच ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. कोलवडी येथील गट नंबर 1365 व गट नंबर 1369 या गटाला शेजारील गटात प्लॉटिंग डेव्हलपर्सने केलेल्या चुकीच्या कारभारामुळे मोठा फटका बसला आहे. येथील गटातील पिके अजूनही पाण्यात बुडाल्याने शेतकरी भाऊसाहेब गायकवाड व इतरांचे नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वीच तलाठी जी. डी. शेख यांनी या गटाची स्थळपाहणी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पंचनामा सादर केला आहे. याठिकाणी पूर्वी अंदाजे दोन किलोमीटर लांबीचा ओढा प्लॉटिंगधारकांनी अतिक्रमण करून गायब केल्याने पाण्याला मार्ग शोधावा लागत आहे. थेऊर – लोणी काळभोरच्या शिवेवर ओढे नाले यांचा नैसर्गिक मार्ग काही ठिकाणी बदलण्याचा प्रकार झाला आहे. पेठ – नायगाव, कुंजीरवाडी येथील लोकवस्तीमध्ये काही ठिकाणी पावसाच्या पुराचे पाणी शिरल्याने ऊस, बाजरी, कांदा, नगदी पिके, भाजीपाला, फुलशेती पाण्याखाली गेली आहे.