नवी दिल्ली – हिंदी चित्रपटसृष्टीतील मेगास्टार अमिताभ बच्चन यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान केला. दरम्यान, राष्ट्रपती भवनामध्ये सोमवारी (दि. २३) त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार होता.
मात्र बच्चन यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या एका विशेष समारंभात त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या नावे या पुरस्काराला 1969 पासून सुरुवात आली होती. त्याच वर्षी अमिताभ बच्चन यांनी “सात हिंदुस्थानी’ चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला प्रारंभ केला होता. सुवर्ण कमळ, शाल अणि रोख 10 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. याप्रसंगी बच्चन यांच्या पत्नी आणि राज्यसभेतील खासदार जया बच्चन आणि मुलगा-अभिनेता अभिषेक बच्चन हेदेखील उपस्थित होते.
तब्बल 5 दशकांच्या चित्रपट अभिनय कारकिर्दीमध्ये अमिताभ हे नेहमीच आपल्या अभिनय क्षमतेने प्रेक्षकांना भरभरून आनंद दिला आणि लोकप्रियतेच्या क्रमवारीमध्ये ते सर्वोच्च पदावर कायम राहिले. हिंदी कवे हरिवंशराय बच्चन यांचे पुत्र असलेल्या अमिताभ यांचा जन्म 1942 साली झाला. त्यांनी मृणाल सेन यांच्या “भुवन शोम’ या बंगाली सिनेमासाठी व्हॉईसओव्हर आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात केली. मात्र “सात हिंदुस्थानी’मधून त्यांच्या अभिनयाला प्रारंभ झाला. त्यानंतर 1973 च्या “जंजीर’मधून त्यांच्या करिअरला उंची मिळाली. या सिनेमाने त्यांना “अँग्री यंग मॅन’ ही प्रतिमा प्रदान केली. त्यानंतर “दीवार’, “शोले’, “मिस्टर नटवरलाल’, “लावारिस’, “मुकद्दर का सिकंदर’, “त्रिशुल’, “शक्ती’ आणि “काला पानी’मधून त्यांची हीच प्रतिमा कायम राहिली. “नमक हलाल’,”सत्ते पे सत्ता’,”चुपके चुपके’ आणि “अमर अकबर अँथनी’मधून त्यांनी विनोदी भूमिकाही केल्या. 2000 सालापासून त्यांनी चरित्र भूमिका साकारायला सुरुवात केली आणि “कौन बनेगा करोडपती’ तून घराघरात पोहोचले. चित्रपट आणि अभिनय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने अमिताभ बच्चन यांना 1984 साली “पद्मश्री’, 2001 साली पद्म भुषण आणि 20115 साली “पद्मविभुषण’ किताबाने सन्मानित केले आहे.