नवी दिल्ली : अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय वादळाने अतिशय रौद्र रूप धारण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील 12 तासांत ते आणखी भीषण स्वरूप धारण करेल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते चक्रीवादळ सध्या गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 860 किमी, मुंबईच्या 970 किमी नैऋत्य, पोरबंदरच्या 1,050 किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या 1,350 किमी दक्षिणेस आहे.
वादळामुळे गुजरातच्या किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये वेगाने वारे वाहून काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरातमधील मच्छिमारांना 14 जूनपर्यंत अरबी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे. बिपरजॉय वादळामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विध्वंस होऊ शकतो. बिपरजॉय वादळामुळे लक्षद्वीप, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे येत्या 5 दिवसांत या राज्यांच्या किनारी भागात मोठा विध्वंस होऊ शकतो. त्यामुळे सध्या समुद्रकिनारी असलेल्या सर्व मच्छिमारांना परतण्यास सांगितले आहे.
बांगलादेशने या वादळाला नाव दिले आहे. बिपरजय म्हणजे नाश. 8 ते 12 जून दरम्यान बिपरजॉय वादळाचा कहर भारतात सर्वात जास्त पाहायला मिळणार आहे. बुधवारी, आयएडीने सांगितले होते की आग्नेय अरबी समुद्रात एक खोल-कमी दाब तयार झाला असून, ज्याचं आता तीव्र वादळात रूपांतर झाले आहे
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बिपरजॉय 8 आणि 9 जून रोजी अंदमान आणि निकोबार बेटांच्या काही भागात कहर करू शकतो. वादळामुळे गुरुवारी वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किमी असेल, जो संध्याकाळी 140 किमी प्रतितास होईल. त्यामुळे कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागाला सर्वाधिक फटका बसणार आहे. 9 जून म्हणजेच शुक्रवारी दक्षिण अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा-महाराष्ट्र या भागात ते आणखी धोकादायक स्वरूप धारण करेल. त्यामुळे सायंकाळपर्यंत ताशी 160 किमी वेगाने वारे वाहू शकतात. 10 जूनपर्यंत हा वेग ताशी 170 किमी असू शकतो. असे सांगण्यात आले आहे.