मुंबई :- रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने मायदेशात होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अफलातून कामगिरी केली आहे.स्पर्धेच्या साखळी फेरीतील सर्व नऊ सामने जिंकत संघाने थेट उपांत्य फेरीत स्थान मिळवले मात्र, साखळी फेरीत पराभूत झालेल्या न्यूझीलंडचा संघ या सामन्यात भारतीय संघाचा विजयाचा अश्वमेध रोखणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दुपारी 2 वाजता सामन्यास सुरूवात होईल. जगभरातील करोडो चाहते या सामन्याची वाट पाहत आहेत. या सामन्याशी भारतीय चाहत्यांचे भावनिक नाते आहे, कारण 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी टीम इंडिया आज न्यूझीलंडला हरवून त्या पराभवाचा बदला घेईल, अशी आशा चाहत्यांना आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड (Semifinal)
वेळ – दुपारी 2 पासून (15 नोव्हेंबर,बुधवार)
ठिकाण – मुंबई
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस नेटवर्क
फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व या चारही आघाड्यांवर भारतीय संघाने कमालीचे सातत्य राखले आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यापासून अखेरच्या साखळी लढतीपर्यंत भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमधील सर्व संघांचा पराभव केला व गुणतालिकेत अव्वलस्थान प्राप्त केले. या सर्व विजयात फलंदाजांचा जीतका वाटा होता, तेवढाच गोलंदाजाचाही होता. तसेच संघाचे नेतृत्व करत असलेला रोहित शर्मा शुभमन गिलसह जवळपास प्रत्येक लढतीत धडाकेबाज सुरुवात करुन देत होता व त्यामुळे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरील दडपण वाढत होते व त्याचा लाभ नंतर येत असलेल्या फलंदाजांना मिळत होता.
भारतीय फलंदाजीबाबत बोलायचे तर रोहित, गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल व सूर्यकुमार यादव अशी भक्कम फळी असून त्यांची कामगिरीही सातत्यपूर्ण होत आहे. जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महमंद सिराज, कुलदीप यादव व रवींद्र जडेजा यांच्यामुळे भारताची गोलंदाजीही भेदक बनली आहे. त्यातच जडेजा हा भारतीय संघासाठी हुकमी एक्का मानला जात आहे. त्याने गोलंदाजी, फलंदाजीसह क्षेत्ररक्षणातही सातत्यपूर्ण कामगिरी केली असल्याने भारतीय संघ आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम संघ बनला आहे. या सामन्यातील
विजयाद्वारे यंदाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज असलेला
भारतीय संघ 2011 सालानंतर तब्बल 12 वर्षांनी विश्वकरंडक उंचावण्यासाठी उत्सूक आहे.
दुसरीकडे न्यूझीलंड संघासाठी ही स्पर्धा संमिश्र राहीली आहे. त्यांनी या
स्पर्धेत 9 सामने खेळताना 5 विजय व 4 पराभव स्वीकारले आहेत. तरीही त्यांनी 10 गुणांसह अव्वल नेट रनरेट ठेवत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. त्यांच्या कामगिरीवर बोलायचे तर त्यांचे प्रमुख फलंदाज सुरुवात चांगली करत आहेत मात्र, त्यात सातत्य दिसलेले नाही. त्यांच्याकडे डेव्हन कॉनवे, विल यंग, नियमित कर्णधार केन विल्यमसन, बदली कर्णधार टॉम लॅथम, डॅरेल मिशेल, राचीन रवींद्र व ग्लेन फिलीप्स अशी तगडी फौज असली तरीही त्यांना अनेक सामन्यात आपल्या दर्जाला साजेसा खेळ करता आलेला नाही.
गोलंदाजीतही त्यांची कामगिरी फारशी चमकदार राहीलेली नाही. ट्रेन्ट बोल्ट, टीम सउदी, लॉकी फर्ग्युसन, मिचेल सॅंटनर, मॅट हेनरी व ग्लेन फिलीप्स असे एकापेक्षा एक सरस गोलंदाज आहत. मात्र, त्यांनाही सातत्याने अपयशाचा सामना करावा लागलेला आहे. आता उपांत्य फेरीत भारतीय गोलंदाज विरुद्ध न्यूझीलंडचे फलंदाज आणि भारताचे फलंदाज व न्यूझीलंडचे गोलंदाज असी चुरस रंगण्याची अपेक्षा आहे.
कोहलीला विक्रमाची संधी…
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याला या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 49 एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडून नवा उच्चांक गाठण्याची सर्वोत्तम संधी मिळणार आहे. याच स्पर्धेत कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या साखळी लढतीत शतक फटकावताना सचिनच्या 49 शतकांची बरोबरी केली होती.
आता उपांत्य लढतीत त्याला हा विक्रम आपल्या नावावर जमा करण्याची संधी असून जर कोहलीला अपयश आले मात्र, भारतीय संघाने अंतिम फेरी गाठली तर कोहलीची संधी कायम राहणार आहे. कारण या स्पर्धेनंतर भारतीय संघ लगेचच कोणतीही एकदिवसीय मालिका खेळणार नसल्याने चाहतेही याच स्पर्धेत कोहलीच्या विक्रमाची प्रतिक्षा करत आहेत.
राचीनकडेही राहणार लक्ष..
भारतीय वंशाचा मात्र, आता न्यूझीलंडकडून खेळत असलेला राचीन रवींद्र याच्याही कामगिरीकडे लक्ष राहणार आहे. त्याने या स्पर्धेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा प्रमुख भार यशस्वीरीत्या हाताळला आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेद्वारे विश्वकरंडक स्पर्धेत पदार्पण करताना साखळी फेरीतील नऊ लढतींत 565 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला लवकरात लवकर बाद करण्यासाठी बुमराह आणि कंपनी जोरदार प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे.
उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस…
आयसीसीने उपांत्य आणि अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवला आहे. म्हणजेच भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याच्या दिवशी 15 नोव्हेंबरला पाऊस पडला तर हा सामना गुरुवारी, 16 नोव्हेंबरला खेळवला जाईल. त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाच्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस आहे. १९ नोव्हेंबरला होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे.
राखीव दिवशीही पाऊस पडला आणि सामना रद्द झाला तर…
जर 15 आणि 16 नोव्हेंबरला पाऊस पडला आणि भारताचा उपांत्य सामना रद्द झाला तर टीम इंडिया अंतिम फेरीत प्रवेश करेल. वास्तविक, आयसीसीच्या नियमांनुसार, उपांत्य फेरीचा सामना रद्द झाल्यास लीग टप्प्यातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ अंतिम फेरीत पोहोचेल. अशाप्रकारे, भारताचा सामना रद्द झाल्यास तो अंतिम फेरीत जाईल, कारण टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे.