#CWC2023 #INDvAUS : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज (रविवार) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हे दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चेन्नईच्या चेपॉक मैदानात सुरु असलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय गोलंदाजांनी स्वस्तात गुंडाळले. कांगारूंनी 200 धावांचे माफक आव्हान दिल्याने, दिग्गज फलंदाजांचा भरणा असलेला भारतीय संघ हे आव्हान सहज पार करेल असे वाटत होते. मात्र पहिल्या षटकापासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करत आहेत.
पहिल्या षटकामध्ये चौथ्या चेंडूवर मिशेल स्टार्कने ईशान किशनला तंबूत धाडले. यानंतर गोलंदाजीस आलेल्या जॉश हेजलवूडने दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला तर याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर श्रेयस अय्यरला ड्रेसिंग रूमचा रस्ता दाखवला. भारताचे पहिले तीन फलंदाज खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतले. यामुळे भारताची अवस्था 2 धावांवर 3 बाद अशी झाली. सध्या विराट कोहली व के एल राहुल खेळपट्टीवर बचावात्मक खेळ करताना दिसत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारतानं 10 षटकांच्या खेळानंतर धावफलकावर 3 बाद 27 धावा जोडल्या आहेत.
सामना रंगतदार होणार?
ऑस्ट्रेलियाने 200 धावांचे किरकोळ आव्हान दिल्याने सामना एकतर्फी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करत सामन्यातील आपले आव्हान कायम ठेवले आहे. एकामागून एक 3 गडी बाद झाल्याने फलंदाजी करत असलेल्या विराट व के एल राहुल यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाकडून करण्यात येतोय.