World Cup 2023 IND vs AUS Final : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना ऐतिहासिक बनवण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ जोरदार तयारी करत आहेत. अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांची मागील आकडेवारी आणि त्यांचा सध्याचा फॉर्म लक्षात घेऊन त्यांच्या विजय-पराजयाची अटकळ बांधली जात आहे. मात्र, संपूर्ण विश्वचषकात भारतीय संघाने घरच्या परिस्थितीत ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यावरून क्रिकेट तज्ज्ञ भारतीय संघाचं पारडं जड ठरु शकतं हे सांगत आहेत.
या सर्वांशिवाय आणखी एक गोष्ट भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाची शक्यता अधिक बळकट करते आणि ती म्हणजे गेल्या तीन विश्वचषकांमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या संघांची आकडेवारी. गेल्या तीन विश्वचषकात विजेतेपद पटकावणाऱ्या संघांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे या तिन्ही संघांनी त्यांच्या घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकला आहे. खरे तर 2011 ते 2019 दरम्यान झालेल्या तीन विश्वचषक स्पर्धेत देशांतर्गत संघच चॅम्पियन बनले आहेत.
भारताने 2011 मध्ये मोडला ‘हा’ समज…
2011 च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारताचा सामना श्रीलंकेशी झाला होता. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये भारताने श्रीलंकेचा पराभव करून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजयानंतर भारताने विश्वचषकाबाबत सुरू असलेल्या मिथकाला(समज) पूर्णविराम दिला. यजमानपद भूषवणारा भारत हा विश्वचषक जिंकणारा पहिला देश ठरला. याआधी झालेल्या नऊ विश्वचषकांमध्ये कोणत्याही यजमान देशाला विजेतेपद मिळवता आले नव्हते.
घरच्या मैदानावरही ऑस्ट्रेलियाने पटकावले होतं विजेतेपद…
2015 विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी संयुक्तपणे आयोजित केला होता. मात्र, अंतिम सामना ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर खेळला गेला, ज्यात कांगारूंनी बाजी मारली. 2015 च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केला होता. अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला गेला आणि यजमानपद भूषवताना प्रथमच ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावले होते.
यजमान पद भूषविताना इंग्लंडने पटकावलं होतं विजेतेपद…
2019 चा विश्वचषक इंग्लंडने आयोजित केला होता. त्याचा अंतिम सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला गेला, ज्याला क्रिकेटचा मक्का असे म्हटले जाते. रोमहर्षक अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून इंग्लंडने प्रथमच विश्वचषक जिंकला होता.
दरम्यान, गेल्या तीन विश्वचषकातील विजेत्यांवर नजर टाकली तर 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारताची विजयी होण्याची शक्यता अधिक वाटते. सध्याच्या विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी पाहता टीम इंडियाच विश्वविजेता होईल, असं प्रत्येक क्रिकेट विश्वातील तज्ज्ञ आणि प्रत्येक चाहत्याचं मत आहे.