जालना – ओबीसींची (Obc) गोष्ट कॉंग्रेस करते, राहुल गांधी करतात, पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणतात की, मी ओबीसी आहे. अरे आज या महाराष्ट्रात ओबीसींचे शिरकाण होत आहे. कुणी तरी लक्ष द्या, आम्ही तर लढणार आहोत. तसेच राज्यात सरकार आहे की नाही, कायदा आहे की नाही? आणि तुम्ही पक्षपातीपणा कराल तर ओबीसीसुद्धा गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित, मुस्लिम, आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही, असा घरचा आहेर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरकारला दिला.
मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र (kunabi Certificate) देण्याच्या विरोधावरून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात शुक्रवारी मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील (manoj Jarange) यांच्यासह राज्य सरकारला थेट इशारा दिला.
छगन भुजबळ म्हणाले, येथे भाजपचे अनेक माझे मित्र बसलेले आहेत. महात्मे हे खासदार आहेत. तुम्ही सांगा तुमच्या नेत्यांना कारण, आज 60 टक्के ओबीसी भाजपला मतदान करतात. पण हे उद्या तुमच्या डोळ्यादेखत आमच्या आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर हे 60 टक्के काय करतील, असे म्हणत छगन भुजबळ यांनी आगामी निवडणुकीत ओबीसींच्या मतदानाबाबत भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.
मराठा आरक्षण (Maratha Rakshan) मिळत नाही तोवर पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत नेत्यांना गावबंदी करण्यात आल्याचे फलक लागले आहेत. तसेच, अनेक सत्ताधारी आमदारांच्या घरांना आग लावण्यावरून छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला.
तसेच लाठीचार्जच्या दिवशी नेमके काय झाले ते मी आज संपूर्ण महाराष्ट्राला सांगणार आहे. खरंतर पोलिसांचा लाठीचार्ज सर्वांनी पाहिला. परंतु, 70 पोलीस जखमी झाले त्याबाबत कोण बोलणार? महिला पोलिसांसह 70 पोलिसांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. हे पोलीस दगडाचा मार खाऊन जखमी झाले होते, असे म्हणत त्यांनी आंदोलकांवर आरोप केला.