आजचा दिवस देशासाठी खूप खास आहे. हा दिवस केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ सर सीव्ही रमण यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. या तारखेलाच १९२८ मध्ये, सीव्ही रामन यांनी रमण प्रभाव किंवा रमण इफेक्टचा शोध जाहीर केला. या शोधासाठी त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिकही मिळाले होते.
० या वर्षाची थीम
१९८६ मध्ये पहिल्यांदा २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी या दिवसासाठी एक थीम निवडली जाते. २०२२ या वर्षासाठी या दिवसाची थीम ‘शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टीकोन’ आहे.
० हा दिवस का साजरा केला जातो?
ही तारीख राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरी करण्याचा मूळ उद्देश देशातील विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांसाठी प्रेरित करणे, त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि त्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणे हा आहे. या तारखेला दरवर्षी देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रम आयोजित केले जातात आणि विद्यार्थ्यांना बक्षिसेही दिली जातात.
० सीव्ही रमण यांच्याबद्दल जाणून घ्या
सी.व्ही.रमण हे देश आणि जगाचे नावाजलेले शास्त्रज्ञ होते. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण होते. रमण यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तामिळनाडूमध्ये झाला. १९०७ मध्ये त्यांनी मद्रास प्रेसिडेन्सी कॉलेजमधून एमएससी पूर्ण केले आणि तेथे सुवर्णपदक जिंकले. यानंतर त्यांनी कलकत्ता येथील ‘इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’मध्ये १९३३ पर्यंत काम केले आणि भौतिकशास्त्राशी संबंधित विविध विषयांवर संशोधन केले.
जाहिरात
० रमण इफेक्ट म्हणजे काय?
रमण इफेक्ट ही प्रत्यक्षात प्रकाश विखुरण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा प्रकाश घन, द्रव किंवा वायू अशा कोणत्याही पारदर्शक माध्यमातून प्रवेश करतो तेव्हा त्याचे स्वरूप आणि प्रकृती बदलते. रसायनांची आण्विक रचना समजून घेण्यासाठी रमण प्रभाव अजूनही एक महत्त्वाचे साधन आहे.
० मनात कसं आलं?
सीव्ही रमण यांना १९२१ साली युरोप भेटीदरम्यान या शोधाची प्रेरणा मिळाली. ते समुद्रमार्गे प्रवास करत असताना त्यांच्या मनात भूमध्य समुद्राच्या निळ्या रंगाबाबत कुतूहल निर्माण झाले. त्यानंतर त्यांनी या विषयावर संशोधन केले. तब्बल सात वर्षांच्या अथक परिश्रमानंतर १९२८ साली त्यांनी संशोधन पूर्ण करून ते जगासमोर मांडले. या शोधासाठी त्यांना १९३० साली विज्ञानातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. विज्ञान क्षेत्रात हा सन्मान मिळवणारे ते भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिले वैज्ञानिक होते.
० ‘भारतरत्न’ने सन्मानित
१९५४ मध्ये, भारत सरकारने सीव्ही रमण यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले. १९७० मध्ये वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांचा शोध आजही संपूर्ण जगाला रस्ता दाखवण्याचे काम करत आहे. त्यांचा ‘रमण इफेक्ट’ आजही विज्ञान क्षेत्रातील नवीन शोध आणि शोधांसाठी तितकाच प्रभावी आहे.