पुणे – वीज खर्च कमी करण्यासाठी पालिकेने राज्य शासनाच्या अंगीकृत कंपनीशी करार केला आहे. त्याअंतर्गत वीज बचतीसह ही कंपनी महापालिकेस सौर उर्जाही पुरविणार आहे. बचत होणाऱ्या बिलातून काही हिस्सा या कंपनीस दिला जाणार आहे. मात्र, कंपनीने वीजबचत उपायांच्या नावे चक्क कोट्यवधी रुपयांची उपकरणे बदण्याचा सल्ला देण्यास सुरूवात केली आहे.
खडकवासला आणि भामा-आसखेड धरण येथे पाणी उचलण्यासाठी प्रत्येकी 8 मोठे पंप आहेत. त्यांची किंमत तब्बल 1 कोटी रु. असून त्याची जोडणी आणि संबंधित यंत्रणेसाठी जवळपास 50 ते 75 लाखांचा खर्च येतो. शिवाय वडगाव-6 तसेच पर्वती जलकेंद्रात 8 रॉ वॉटर पंप आहेत. येथून पाणी पुरवठ्यासाठी जवळपास 195 ते 200 कोटी रुपयांचा वीज खर्च येतो.
तो कमी करण्यासाठी मनपा विद्युत विभागाच्या माध्यमातून या कंपनीने पुढाकार घेतला आहे. मात्र, त्यासाठीचा प्रस्ताव उपाय योजनांचा सविस्तर आराखडा करण्याऐवजी थेट पाणीपुरवठा विभागाकडे पाण्याचे पंपच बदलण्याचा प्रस्ताव दिला आहे. यातील भामा-आसखेडचे पंप तर नवीन असून नुकतीच खडकवासला येथील पंपाची पाच ते सात कोटी खर्च करून दुरुस्तीही करण्यात आली आहे.
अशा स्थितीत हे पंप बदलायचे असल्यास महापालिकेचा पंपासाठीचा जवळपास 35 ते 30 कोटींचा खर्च पाण्यात जाणार आहे. तसेच नवीन पंपाचे पैसेही महापालिकेस इतर कोणत्यातरी माध्यमातून द्यावे लागणार आहेत. याबाबत प्रस्ताव तयार करणे सुरू असून, त्यासाठी पाणीपुरवठा विभागाकडे प्राथमिक बैठका झाल्या आहेत.
आधीच एक प्रयोग फसला..
वीज बचतीचा असाच एक प्रयोग पालिकेने दोन कंपन्यांसोबत केला होता. त्यात शहरातील सर्व दिवे बदलून एलईडी दिवे लावले जाणार होते. त्यातूनही मोठी बचत होईल, असे सांगण्यात येत होते. मात्र, करारावेळी जाणीवपूर्वक कायदेशीर त्रुटी ठेवण्यात आल्याने पालिकेलाच या कंपन्यांना पैसे मोजावे लागले. तसेच वादांनंतर त्यावर दंड भरावा लागला. पालिकेने बचतीऐवजी वीज वापरली असती तर त्यापेक्षाही अधिक खर्च आतापर्यंत झालेला आहे. त्यामुळे अशा कल्पनांतून “शॉक’ बसलेला असताना पालिकेने पुन्हा नवीन प्रयोग हाती घेतला आहे.