पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत असताना लोकवस्त्या आणि औद्योगिक भागात सातत्याने लहान-मोठ्या आगीच्या घटना घडत आहेत. मात्र, अग्निशामक केंद्रांची संख्या, अपुरे मनुष्यबळ, अत्याधुनिक वाहनांची आवश्यकता असल्याने आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात. यासाठी अग्निशामक विभाग 80 कोटींची परदेशी बनावटीसह 18 वाहने खरेदी करणार आहे. यासाठी काही वाहनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काहींची निविदा बाकी आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या सुमारे 30 लाखांच्या घरात आहे. शहरात झोपडपट्ट्यांबरोबरच दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणात आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. शहराच्या उपनगरांमध्ये मोठ्या संख्येने औद्योगिक, आयटी कंपन्या आहेत. नियमाप्रमाणे लोकसंख्येनुसार शहरामध्ये 18 अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरात केवळ 8 केंद्रे आहेत. महापालिकेचा अग्निशामक विभाग हा अत्यावश्यक सेवेचा आणि अत्यंत संवेदनक्षम विभाग आहे. शहरातील नागरिकांची जीवित आणि वित्तहानी वाचविण्याचे जोखमीचे कामकाज अग्निशामक विभागामार्फत केले जाते.
नवीन अग्निशामक केंद्रासाठी व शासनाकडून नव्याने एकत्रित विकास नियंत्रण नियमावली 2020 मध्ये इमारतीची उंची अमर्यादित केली आहे. यामुळे शहरामध्ये वाढणाऱ्या उंच इमारतीची संख्या विचारात घेता आणि अशा इमारतीमधील अग्निशामक व विमोचन कार्याकरीता अग्निशमन विभागाकडे अद्यावत अग्निशामक वाहन उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणातील औद्योगिक कंपन्या वसत्यामधील अतिज्वलनशील तरल, द्रव पदार्थ यांचे आगी क्षमविण्यासाठी ही अद्यावत वाहनांची आवश्यकता आहे. शहरात काही भांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरत असल्याने, पूरजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी विविध बोटींची, वाहनांची आवश्यकता आहे.
अग्निशामक विभाग सक्षम करण्यासाठी महापालिकेने पाऊले उचलली आहेत. त्यानुसार अग्निशामक विभाग सुमारे 80 कोटींची परदेशी बनावटीसह 18 वाहने खरेदी करणार आहे. यासाठी काही वाहनांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून काहींची निविदा प्रक्रिया करणे बाकी आहे.
– विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, अग्निशामक विभाग
सध्या 28 वाहने विभागाकडे उपलब्ध
अग्निशामक विभागाचे पिंपरी, भोसरी, प्राधिकरण, रहाटणी, तळवडे, चिखली, थेरगाव व मोशी हे 8 केंद्रे आहेत. यामध्ये 28 अग्निशामक वाहनांच्या माध्यमातुन तीन शिफ्टमध्ये 24 तास अखंड अग्निशामक सेवा कार्यरत आहे. अग्निशामक सेवा भारत सरकारच्या निकषानुसार शहरी भागासाठी 10 कि.मी. परीघ क्षेत्रामागे एक अग्निशामक केंद्र आवश्यक असल्याने 18 अग्निशमन केंद्राची आवश्यकता असून, सध्या केवळ 8 केंद्र कार्यरत आहेत. नव्याने 10 केंद्र उभारण्यात येणार असून चार केंद्राची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ही वाहने खरेदी करणार
70, 54 आणि 32 मीटर उंचीचे परदेशी बनावटीचे 3 वाहने, सहा हजार लिटर क्षमतेचे 6 फायर टेंडर, फ्लड रेस्कयू-1, 18 हजार लीटर क्षमतेचे वॉटर कॅनन-3, बीए सेट व्हॅन-1, डीसीपी टेंडर-1, फोम टेंडर-1, ऍडव्हान्स रेस्कयू व्हॅन-2 अशी 80 कोटींची 18 वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.