अरुण गोखले
आपली संस्कृती आपल्याला हात हालवायला नाही, तर हात जोडायला शिकविते. नम्रतेने मान खाली झुकवायला शिकविते.
जेव्हा दोन व्यक्ती या एकमेकांच्या समोर येतात, परस्परांना भेटतात तेव्हा ते “राम राम’ असे म्हणतात. त्या परस्परांच्या अभिवादनाच्या वेळी नकळत दोघांच्याही माना विनम्रतेने खाली झुकलेल्या असतात. जोडलेले हात छातीशी आलेले असतात. जणू त्या कृतीतून ते दोघेही परस्परांच्या अंतरंगीच्या ईश्वरीतत्त्वास ओळखून त्यालाच जणू वंदन करीत असतात. या आणि अशा सादेस नक्कीच तसाच सकारात्मक प्रतिसाद मिळत असतो. या वंदनाने त्यांची मने आनंदीत होतात. जवळीक वाढते, आपलेपणा, प्रेम, आस्था जिव्हाळा वाढतो.
हे असे वंदन, नमस्कार, अभिवादन प्रत्येक धर्मात आहे. त्यांची भाषा, पद्धती, शब्द वेगळे असले तरी त्यामागची सहृदयतेची भावना मात्र एकच असते. आपल्या संस्कृतीत नमस्काराला मोठे महत्त्व दिलेले आहे. या नमस्कारांचे प्रकारही वेगवेगळे असून त्याची कारणेही भिन्न भिन्न असू शकतात.
नमस्काराच्या बाबतीत एक मोलाचा विचार नेहमीच आठविल्याशिवाय राहात नाही. आपल्याकडे “नमस्कार फुकाचा आणि आशीर्वाद लाखाचा’ असे एक वचन आहे. खरोखरच आपण समोरच्या व्यक्तीस त्याची योग्यता, पात्रता, ज्येष्ठता ओळखून विनम्रभावे वंदन केले की कळत नकळत त्यांच्या मुखातून येणाऱ्या शुभाशीर्वादाने आपली झोळी भरून जाते. फुकाच्या नमस्काराला लाख मोलाचा आशीर्वाद मिळतो.
वास्तविक नमस्काराला, विनयाला, नम्रतेला कोणत्याच प्रकारचा आर्थिक बोजा नसतो. फक्त त्यासाठी आपल्याकडे असावे लागते ती नम्रता आणि लीनता. आपण आपला मोठेपणा, ताठा, गर्व सोडला की ही बहुमोल देणगी सहज आपल्या पदरात पडते.
आपण कुणाला नमस्कार करतोय यावर त्याची पद्धत अवलंबून असते. उदा., समवयस्क म्हणजे आपल्याच वयाचे मित्र- मैत्रीण असेल तर एकमेकांना हात जोडून, समोरची व्यक्ती आई-वडील, काका-काकू, आजी-आजोबा असतील तर त्यांना वाकून नमस्कार करावा. श्रेष्ठ गुरूजन, साधू संत, सत्पुरुष असतील तर त्यांचे पदवंदन करावे. जर तुम्ही मठ मंदिरातील, देवळातील देवदेवतांना त्यांचे दर्शन घेऊन नमस्कार करत असाल तर तो नमस्कार म्हणजे अनन्यभावे शरणागत भावांनी घातलेले साष्टांग लोटांगण असावे.
“जे जे भेटे भूत… ते ते मानिजे भगवंत’ ह्या विशाल दृष्टिकोनातूनच हा नमस्काराचा सांस्कृतिक आचार आणि विचार आपल्याला शिकविलेला आहे.