गुवाहाटी – आसामातील एका आमदाराच्या वडिलांच निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला तब्बल दहा हजार नागरीकांनी गर्दी केली होती. त्यातून करोनाचा मोठा धोका उद्भवल्याने त्या परिसरातील तीन गावे सील करण्याची वेळ आली आहे. त्या राज्यातील नागाव जिल्ह्यात ही घटना घडली. तेथील स्थानिक आमदार अमिनुल इस्लाम यांचे वडिल खैरूल इस्लाम यांचे नुकतेच वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.
त्यानंतर त्यांच्या अंत्यविधीला आसपासच्या गावातील तब्बल दहा हजाराहून अधिक लोकांनी गर्दी केली होती. त्या संबंधीचे वृत्त सोशल मिडीयावरून प्रसारीत झाल्यानंतर प्रशासन सक्रिय झाले आणि त्यांनी तीन गावे सील केली आहेत.
दरम्यान या प्रकरानंतर आमदार महाशयांनी म्हटले आहे की आमचे वडिल हे प्रतिष्ठीत नागरीक होते त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी नागरीकांनी ही गर्दी केली. वास्तविक ही गर्दी होऊ नये यासाठी आम्हीं प्रयत्न केले होते. पोलिसांनीही अनेकांना स्मशानभुमीत येण्यापासून रोखून त्यांना परत पाठवले असल्याचेही आमदार महाशयांनी नमूद केले आहे.