श्रीगोंदा (प्रतिनिधी) – मागील वर्षी ऊस उपलब्धते अभावी नागवडे कारखान्याचा गाळप हंगाम बंद होता. आगामी हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. कारखान्याची यंत्रसामग्री देखभाल दुरुस्तीची कामेही अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे या हंगामात नागवडे कारखान्याने नऊ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले आहे.
राजेंद्र नागवडे यांच्या हस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नागवडे कारखान्याने सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून सर्वांच्या बरोबरीने बाजारभाव दिला आहे. कधीही शेतकऱ्यांची देणी थकली नाहीत. प्रसंगी ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षा अधिक दर दिलेला आहे. स्व. शिवाजीराव नागवडे यांचा वारसा चालविण्याचे काम व्यवस्थापन यशस्वीपणे करीत आहे. स्व. बापूंचे स्वप्न असलेल्या 26 मेगावॉट क्षमतेच्या सहवीज प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, या प्रकल्पाची चाचणी यशस्वी झालेली आहे. या हंगामापासून सहवीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
सहवीजनिर्मिती प्रकल्पामुळे कारखान्याचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे सभासद, शेतकऱ्यांना अधिक ऊसदर देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे गेले काही दिवस बंद असलेल्या आसवनी प्रकल्पाचे आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून, हा प्रकल्पही या हंगामात पूर्ववत कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच काटकसरीने कारभार करुन सभासद व ऊस उत्पादक हिताला सर्वोच्च प्राधान्य देवून ऊस उत्पादकांना अधिकाधिक दर देण्यासाठी संचालक मंडळ कटिबद्ध राहील, असेही ते म्हणाले.
यावेळी कारखान्याचे संचालक विश्वनाथ गिरमकर, श्रीनिवास घाडगे, पंचायत समितीचे माजी सभापती अरुणराव पाचपुते, योगेश भोईटे, विलासराव काकडे, प्रा. सुनील माने, युवराज चितळकर, शरद जगताप, कार्यकारी संचालक रमाकांत नाईक, कारखान्याचे मुख्य अभियंता रामचंद्र मखरे, सहवीजनिर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापक संजय दिघे, स्थापत्य अभियंता संपत कुलांगे आदींसह अधिकारी, कामगार व शेतकरी उपस्थित होते. कार्यकारी संचालक रमाकांत नाईक यांनी प्रास्ताविक केले, तर रामचंद्र मखरे यांनी आभार मानले.