पुणे – राजकारण हे राजकारणापुरतेच ठेवून, माणुसकी जपणारा नेता, सर्वपक्ष समभाव बाळगणारा आणि याच धर्माने जगणारा नेता म्हणजे गिरीश बापट, अशा शब्दांत सर्व पक्षीय नेत्यांनी दिवंगत खासदार गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील, प्रकाश जावडेकर, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, बाळा नांदगावकर, अशोक मोहोळ, अजित अभ्यंकर, अंकुश काकडे, महादेव जानकर, हर्षवर्धन पाटील, प्रदीप रावत, मोहन जोशी, गौरव बापट, स्वरदा बापट, अरविंद शिंदे, संजय शिंदे, बाबु वागस्कर, संजय मोरे आणि प्रेक्षकांमध्ये बापट यांच्या पत्नी गिरीजा उपस्थित होत्या.
एखादी व्यक्ती किती जगली, यापेक्षा ती कशी जगली याला जास्त महत्त्व असल्याचे लोकमान्य टिळक म्हणायचे. तेच सूत्र बापट यांना लागू होते, ते तसेच जगले, अशा शब्दांत गडकरी यांनी श्रद्धांजली वाहिली. आणीबाणीच्या काळात बापट यांची ओळख झाली आणि त्यांचा परिचर अधिक पारिवारिक झाला. असे सांगून “पॉझिटिव्हिटी’ ही खरी त्यांची ताकद होती. कोणत्याही माणसाला निराश न करता त्याच्या मदतीला धावून जाणारा हा माणूस होता. कोणाशीही द्वेष, असूया ठेवणे, राग ठेवणे हा त्यांचा स्वभाव नव्हता, असे गडकरी म्हणाले.
मंत्रीपदावर गेल्यावर सर्वसामान्य लोकांच्या हिताचे काही असेल तर मार्गदर्शन करा, असे ते मला म्हणाले. मी दुसऱ्या पक्षाचा असूनही, त्यांनी असे म्हणणे हे महत्त्वाचे होते. कामगार चळवळ, नागरी प्रश्नासाठी एकत्रित भूमिका घेतली पाहिजे, असे त्यांचे मत होते, परंतु हे करताना पक्षाच्या विचाराशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही, असे पवार यांनी सांगितले आठवले यांनी कवितेच्या स्वरूपात श्रद्धांजली वाहिली. बापट जन्माने ब्राह्मण होते; परंतु त्यांनी कोणताही जातीभेद केला नाही. ते आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्तेच होते, असे आठवले म्हणाले.
इतरांना मोठे करण्यात त्यांनी आनंद मानला. हातातून गेलेला पुणे पदवीधर मतदारसंघ परत मिळवण्यासाठी बापट यांनी मला आत्मविश्वास दिला. स्व. बाळासाहेब आपटे आणि बापट यांच्यामुळेच मी निवडणूक जिंकलो. सगळ्या अडचणींच्या वेळी “बूस्ट’ देण्याचे काम बापट यांनी केल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
सामंत, अभ्यंकर, रावत, जावडेकर, हर्षवर्धन पाटील, जोशी, अहिर, नांदगावकर, श्रीनिवास पाटील, उल्हास पवार यांचेही भाषण झाले. काकडे यांनी प्रास्ताविकात बापट यांच्या आठवणी सांगितल्या.
सगळ्यांच्या ऋणात राहणे आवडेल – गौरव बापट
वडिलांच्या वागण्यात कोणतीही कृत्रिमता नव्हती हे मी माझ्या लहानपणापासून पहात आलो आहे. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहणे आम्हाला आवडेल. यापुढील काळातील गणिते आम्हाला माहीत नाहीत, आपण आमचे कान धरावे, आम्हाला शिकवण द्यावी, बरोबर चालायला मदत करावी, हेच आम्हाला हवे आहे, असे गिरीश बापट यांचा मुलगा गौरव यांनी ऋणनिर्देशात सांगितले.