नेवासे -दोन्ही गावे शिवेशेजारची. एका गावात पाण्याचा सुकाळ, तर दुसरे गाव पाण्यासाठी आसूसलेले. एका गावची उभी पिके पाण्याखाली, तर दुसऱ्या गावचे शिवार पाण्याअभावी होरपळलेले. पाटबंधारे विभागाच्या कृपेने सध्या देडगावात पिके पाण्याखाली गेली आहेत, तर जेऊरहैबती शिवारात शेतकऱ्यांना पाटपाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.
मुळा उजव्या कालव्याचे आर्वतन सुटून सव्वा महिना लोटला, तरी जेऊरहैबती, चिलेखनवाडी, वाकडी, पिंप्री शहाली आदी गावांच्या शिवारात पाटपाण्याची प्रतीक्षा आहे. मात्र देडगावातील पिके पाण्याखाली गेली आहेत. देडगाव व जेऊरहैबती ही ऐकमेकांच्या शिवारालगतची गावे. देडगाव व जेऊरहैबतीच्या शिवार सीमेवर पाटपाण्याखाली उभी उसाची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत. तर काही ठिकाणी त्यांना जलसमाधी मिळाली आहे. सीमेवरच्या ओढ्याला पाटाचे पाणी खळखळून वाहत आहे. दुसरीकडे जेऊरहैबती शिवारात उभी पिके पाटपाण्याअभावी होरपळून गेलेली आहेत.
लगतच्या दोन्ही शिवारांत पाटबंधारेच्या नियोजनाअभावाने परस्पर विरोधी शेतीचे चित्र दिसत आहे. जेऊरहैबती लगतच्या चिलेखनवाडी शिवारही पाटपाण्याच्या प्रतीक्षेत उभ्या उसाची होरपळ झाली आहे. चिलेखनवाडीचे सरपंच प्रा. भाऊसाहेब सावंत यांनी पाटपाण्याअभावी जळालेल्या चिलेखनवाडी शिवारातील पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी नेवाशाच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. वाकडी, पिंप्राशहाली, शिरसगाव आदी गावांच्या शिवारातही पाटपाण्याच्या तक्रारी होत आहेत. मात्र पाटबंधारे विभागाच्या कृपेने काही गावांतील पिके पाण्याखाली गेली आहेत, तर काही गावांना अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.