शिरूर -तालुक्यातील न्हावरे, मलटण व टाकळी हाजी भागामध्ये पेरणी केलेले बाजरीचे पायनियर कंपनीचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांमधून होत आहेत. अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. लॉकडाऊन आणि त्यात निकृष्ट बियाणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
शिरूर तालुक्यात यंदाच्या चांगला पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या सुरू केल्या आहेत. टाकळी हाजी, मलठण, न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांनी पायोनियर कंपनीच्या बाजरीच्या बियाणांची पेरणी केली होती. परंतु पेरणीनंतर पंधरा दिवस झाले तरी उगवण झाली नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डीलर दुकानदार यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. एक एकरावर बाजरीची पेरणी करायची असेल तर साडेचार ते साडेपाच हजार रुपये खर्च येतो. तालुक्यात हजारो हेक्टरवर बाजरीची पेरणी केली आहे.
शिरूर तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र 21 हजार 913 हेक्टर आहे. मागीलवर्षी 19 हजार हेक्टरवर बाजरीच्या पेरण्या झाल्या होत्या. कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांना गोलमाल करण्याची शक्यता आहे, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेते डीलर यांच्याकडे तोंडी तक्रारी केल्या आहेत. लेखी तक्रारी पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे करणे गरजेचे आहे. दरम्यान, शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले पायोनियरचे बियाणे बोगस निघाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. कंपनीने शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी जिल्हा परीषद सदस्या सुनीता गावडे यांनी केली आहे.
जर बाजरी बियाणे उगवले नसेल तर याबाबत लेखी तक्रारी शिरूर पंचायत समिती कृषी विभागाकडे करावी. ही तक्रार आल्यानंतर तक्रार समिती अध्यक्ष उपविभागीय कृषी अधिकारी व सदस्य सचिव तथा कृषी अधिकारी यांच्या समितीकडून तात्काळ बांधावर जाऊन पाहणी अहवाल शेतकऱ्यास दिला जातो. बाजारात विक्रीसाठी असलेल्या विविध कंपनीच्या बाजरी बियाणांचे नमुने कृषी विभागाकडून काढले जातात. हे बियाणे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहे. याचा तपासणी अहवाल जर अप्रमाणित आला तर त्या कंपनीवर न्यायालयीन दावा दाखल करण्यात येतो.
निलेश बुधवंत, कृषी अधिकारी शिरूर पंचायत समिती पायोनियरचे बियाणे उत्कृष्ट दर्जाची असून, काही शेतकऱ्यांनी बियाण्याची लवकर पेरणी केली आहे. त्यामुळे जमिनीतील धूप बियांना लागून ते जळाली असतील. दि. 9 ते 13 जून या कालावधीत मोठा पाऊस झाला होता. 60 मिमी पाऊस झाला आहे. जास्त पाण्यामुळेही बियाणे दबले गेले आहे. यात बियाणे, कंपनी, शेतकऱ्यांचा दोष नाही. तरीही कंपनीचे काही कर्मचारी तालुक्यात तपासणी करीत आहेत.
-सागर पांडे, एरिया सेल्स मॅनेजर, पायोनियर कंपनी.
7 जूनला टाकळी हाजी येथे मशागत करून पायोनियरची बाजरी बियाणे तीन एकरांत पेरणी केली होती. वेळेत पाऊस झाल्याने पीक चांगले येईल, असे वाटत असताना मात्र यावेळी बाजरीची उगवण झाली नाही. निकृष्ट दर्जाचे बियाणे मिळाले आहे. यात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शेतकऱ्याला नुकसान भरपाई लवकर शासनाने द्यावी.
-शांताराम उचाले,
शेतकरी टाकळीहाजी.