पुणे -अलीकडच्या काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. विविध आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्यात दाखल होणारे सायबर फसवणूक प्रकरणातील अडीच लाख रुपयांहून जास्त रकमेचे गुन्हे आता सायबर पोलीस ठाण्याकडे तपासासाठी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सायबर पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तत्पर तपासासाठी अतिरिक्त कर्मचारी पुरविण्याचा निर्णय पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी घेतला आहे.
शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात सायबर फसवणुकीच्या तक्रारी वाढत आहेत. यापूर्वी 25 लाख रुपयांहून जास्त रकमेचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्याकडे सोपविले जात होते. त्यापेक्षा कमी रकमेची फसवणूक झाल्यास गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस करत असत. मात्र, अलीकडे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारींचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी 25 लाख रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक झाल्यास संबंधित गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.
त्यापेक्षा कमी रकमेच्या गुन्ह्याचा तपास स्थानिक पोलीस करत होते. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील एक पोलीस अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, पोलीस ठाण्यातील सायबर गुन्ह्यांचा तपास संथगतीने होत असल्याचे दिसून आल्याने पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अडीच लाखांहून जास्त रकमेचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यांकडे सोपविण्याचे आदेश दिले आहेत.
मागील वर्षी सायबरचे 434 गुन्हे दाखल
शहरात सायबरसह विविध पोलीस स्टेशमध्ये गुन्ह्याच्या तब्बल 24 हजार 434 तक्रारी दाखल आहेत. यांची पडताळणी केल्यानंतर 434 सायबर गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी 394 सायबर पोलीस ठाण्यात, तर उर्वरित 40 गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले आहेत. यंदा मार्च महिनाअखेरीपर्यंत 3 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तपासासाठी तक्रारदारांनी त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
व्यापाऱ्यांचा शेतकऱ्याला गंडा
अडीच लाख रुपयांहून जास्त रकमेचे गुन्हे सायबर पोलीस ठाण्यात वर्ग करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. सायबर चोरट्यांची गुन्ह्यासाठीची पद्धती जाणून घेऊन गुन्ह्याची उकल करणे शक्य होईल, असे ऍड. अभिषेक हरगणे म्हणाले.