पुणे, {प्रभात वृत्तसेवा}: शेतीच्या सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद पुनर्स्थापित करण्यासाठी खासगी व्यक्तीच्या हस्ते ७ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडल अधिकाऱ्यांसह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी शिरूर येथील मंडल अधिकारी जयश्री कवडे, मध्यस्थ योगेश कांताराम तातळे (वय २२, रा. चौधरी पार्क, बाळू कदम पार्क, दिघी), मध्यस्थ विजय सुदाम नाईकनवरे (वय ३८, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांच्याविरुद्ध लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका २५ वर्षीय तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तक्रारदारांच्या खापर पणजोबांचे (आजीच्या आईचे वडील) हवेली तालुक्यातील कोलवडी येथे असलेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावरील नाव कमी झाल्याचे दिसून आले होते. या नावाची नोंद पुनर्स्थापना करण्यासाठी तक्रारदारांच्या आजी आणि त्यांच्या बहिणींनी हवेली तहसीलदारांकडे अर्ज केला होता.
यानंतर तहसीलदारांनी कोलवडी येथील गाव कामगार तलाठी व थेऊर येथील मंडल अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. तलाठी यांनी घेतलेल्या फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी तक्रारदार हे थेऊर कार्यालयात जाऊन मंडल अधिकारी जयश्री कवडे यांना भेटले. या वेळी जयश्री कवडे यांनी खासगी व्यक्ती विजय नाईकनवरे यांना भेटायला सांगितले.
या वेळी नाईकनवरे याने नोंद करण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदारांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर जयश्री कवडे यांच्यासाठी तडजोडीअंती ७ हजारांची लाचेची मागणी योगेश तातळे, विजय सुदाम नाईकनवरे यांनी केली.
त्यानंतर सापळा रचून लाच घेणाऱ्या नाईकनवरेला पकडले. जयश्री कवडे यांनी योगेश तातळे, विजय सुदाम यांना लाच घेण्यासाठी प्रोत्साहन दिले म्हणून तिघांविरुद्ध लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक डाॅ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपाधीक्षक माधुरी भोसले तपास करत आहेत.