भुवनेश्वर – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत एक घटना घडली व त्यामुळे एका खेळाडूच्या कामगिरीचे संपूर्ण देशाने कौतुक केले आहे. बडोदा संघाचा फलंदाज विष्णू सोलंकी ( Vishnu Solanki ) याच्या अवघ्या एक दिवसाच्या तान्ह्या बाळाचे निधन झाले होते. मात्र हे दुखः बाजूला ठेवत विष्णू मैदानात उतरला आणि त्याने चंदीगढविरुद्ध दमदार शतक फटकावले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांनी त्याच्या जिद्दीला सलाम केला आहे.
विष्णूने भुवनेश्वरमध्ये खेळताना ही कामगिरी केलीय. या कामगिरीच्या जोरावर बडोद्याचा संघ दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सात बाद 398 धावांपर्यंत मजल मारु शकला. चंदीगढवर बडोद्याने 230 धावांची आघाडी घेतली आहे. चंदीगढचा पहिला डाव 168 धावांवर संपला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विष्णूने 161 चेंडूंमध्ये नाबाद 103 धावा केल्या. या खेळीत त्याने 12 चौकार फटकावले.
विष्णू भुवनेश्वरमध्ये या सामन्यासाठी दाखल झालेला असतानाच त्याला त्याच्या चिमुकल्या मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाली. अवघ्या एक दिवसाच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर संघ व्यवस्थापनाने त्याला बायोबबल मधून बाहेर जाण्यास परवानगी दिली.
तो हैदराबाद मार्गे बडोद्याला आला. त्याने आपल्या मुलीचे अंत्यसंस्कार केले व लगेचच तो पुन्हा संघात दाखल झाला. त्याने विलगीकरण कालावधी पूर्ण करुन मैदानात खेळण्यासाठी उतरत शतक फटकावले.