अमित डोंगरे
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर झाला व हार्दिक पंड्याला त्याची जागा समजली असावी. केवळ अष्टपैलू हा निकष असून चालत नाही तर स्वतःच्या वृत्तीतील अहंकारही सोडावा लागतो तरच एक सामान्य खेळाडू महान खेळाडू बनतो. बुधवारच्याच दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीतही त्याचा तोल ढळल्याचे अनेकदा दिसून आले.
गुजरात टायटन्स संघाला गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेत पदार्पणातच विजेतेपद मिळवून देत त्याने आपल्या यशस्वी नेतृत्वाचा दाखला दिला हे मान्य; परंतु त्याचवेळी त्याच्यात अहंकार ओतप्रोत भरला गेल्याचेही दिसले. संघातील वरिष्ठ खेळाडूंशी बाचाबाची करणे, त्यांना उलटसुलट बोलणे, आपलीच मनमानी करणे हे त्याचे सर्वोत्तम गुणच त्याला भोवले आहेत.
भारतीय संघाच्या निवड समितीने त्याच्या जागी शार्दुल ठाकूरचा कसोटी संघात समावेश केला ते पाहता आता पंड्याने आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे. कारण, आवडता व नावडता खेळाडू एका दिवसात ठरत नाही. त्याच्या कामगिरीकडे, मैदानावरील तसेच मैदानाबाहेरील त्याच्या वावराकडे व वर्तनाकडेही सातत्याने नजर ठेवली जाते. संघातील खेळाडूंना शिवीगाळ करणे, आपल्या हातून झालेल्या चुका लपवत त्याचे किंवा पराभवाचे खापर अन्य गोष्टींवर किंवा खेळाडूंवर फोडणे ही कला तो ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान संघाकडून लवकर शिकला असेच म्हणावे लागेल.
पंड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्याच्यात ती वेस्ट इंडियन गुणवत्ता दिसली. त्याच्यात वेस्ट इंडियन बेदरकारपणा व नैसर्गिक खेळ करण्याची क्षमताही दिसली व त्यानेही ती सिद्ध केली; परंतु बेदरकारपणाला शिस्तीचे कोंदण नसेल तर काय होते ते देखील त्यानेच दाखवून दिले. अजूनही त्याच्यासमोर मोठी कारकीर्द आहे. त्याच्याकडे अद्याप भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व आहे. आता केवळ त्याने आत्मपरीक्षण करत स्वतःमध्ये बदल केला व शांततेनेही खूप काही प्रश्न सुटतात यावर विश्वास ठेवला तर त्याचेही कसोटी संघातील पुनरागमन कठीण नाही.