माधव विद्वांस
कवी, चतुरस्र लेखक, पटकथाकार, नाटककार, संपादक व पत्रकार प्रा. अनंत आत्माराम काणेकर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म मुंबई येथे 2 डिसेंबर, 1905 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मुंबई-गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. वर्ष 1927 मध्ये बीए तसेच वर्ष 1929 मध्ये एलएलबी झाल्यावर मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी वकिलीची सनदही मिळविली. वर्ष 1933 मध्ये त्यांच्या “चांदरात’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे आणि वर्षभरातच “पिकली पाने’ या लघु निबंधसंग्रहाचे प्रकाशन झाल्यानंतर त्यांनी 1935 साली वकिली सोडली व साहित्यसेवेत वाहून घेतले.
ते वर्ष 1933 मध्ये नाट्यप्रेमामुळे मुंबईतील “नाट्यमन्वंतर’ या प्रयोगशील नाट्यसंस्थेचे संस्थापकामध्ये सामील झाले. 1935 ते 1939 या कालावधीमध्ये मुंबईच्या चित्रा या साप्ताहिकाचे ते संपादक होते. 1941 ते 1946 या कालावधीमधे मुंबईच्या “खालसा महाविद्यालयात’ ते मराठीचे प्राध्यापक होते. त्यानंतर मुंबईच्याच “सिद्धार्थ महाविद्यालया’त ते विभागप्रमुख होते.
चाकोरीबाहेर लिहिलेल्या त्यांच्या कवितांत प्रादेशिक लोकगीतांचे, विडंबन काव्याचे, पुरोगामी सामाजिक आशयाचे आणि प्रेमभावनेचा प्रसन्न आविष्कार दिसून येतो. “नाट्यमन्वंतर’ या संस्थेमुळे प्रयोगशील मराठी रंगभूमीशी ते जोडले गेले. “निशिकांतची नवरी’, “घरकुल’ व “फांस’ ही त्यांची रूपांतरित नाटके प्रयोगशील रंगभूमीला सहाय्यक ठरली. वर्ष 1934 मध्ये “पिकली पाने’ हा काणेकरांचा पहिला लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध झाला.
वर्ष 1925 पासून लघुनिबंध हा मराठीत अवतरलेला नवीन गद्य साहित्यप्रकार फडके-खांडेकरांबरोबर त्यांनी संपन्न केला. “गणूकाका’ हे त्यांच्या लघुनिबंधातील कल्पित पात्र आपल्या पुराणवादी वादप्रियतेने संस्मरणीय झाले आहे. वैचारिकता, नाट्यपूर्ण शैली व आटोपशीरपणा असलेले त्यांचे निबंध रूढ संकेतांना धक्के देणारे ठरले. “शिंपले आणि मोती’, “तुटलेले तारे’, “उघड्या खिडक्या’ व “विजेची वेल’ हे त्यांचे अन्य लघुनिबंधसंग्रह.
त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली. त्यामध्ये “धुक्यातून लालताऱ्याकडे’, “आमची माती आमचे आकाश’, “निळे डोंगर तांबडी माती’, “रक्ताची फुले’, “खडक कोरतात आकाश’, “सोनेरी उन्हात पाचूची बेटे’ आणि “गुलाबी प्रकाशात बोलक्या लेखण्या’ ही पुस्तके प्रसिद्ध होती. त्यांच्या प्रवासवर्णन लेखनामुळे मराठीतील प्रवासवर्णनांना वाङ्मयीन दर्जा प्राप्त झाला. त्यांची प्रवासवर्णने स्थलचित्रे, निसर्गचित्रे, व्यक्तिरेखा, प्रसंगचित्रे व समाजचित्रण यांनी संपन्न असल्यामुळे रंजक झाली आहेत.
त्यांच्या काही गीतांच्या ध्वनिमुद्रिका आजही लोकप्रिय आहेत. “आता कशाला उद्याची बात’ हे त्यांचे गीत तसेच “आला खुशीत् समिंदर’ हे ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेले त्यांचे गीत रसिकांच्या ओठावर आजही आहे. औरंगाबादच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे वर्ष 1957 चे ते अध्यक्ष होते. “साहित्य अकादमी’चे व “संगीत नाटक अकादमी’चे सदस्य होते. तसेच “महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चेही ते सदस्य होते. सोव्हिएत लॅंड नेहरू पुरस्कार तसेच वर्ष 1965 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 4 मे 1980 रोजी त्यांचे निधन झाले.