अस्पृश्यता नष्ट झाली तरच समाजवादाला अर्थ
मुंबई, दि. 3 – अस्पृश्यता नष्ट झाल्याशिवाय समाजवादाला काही अर्थ नाही. महर्षी शिंदे यांचे कार्य त्यामुळेच अत्यंत महत्त्वाचे आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी महर्षी शिंदे यांच्या “भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या ग्रंथाचे प्रकाशन करताना काढले. डॉ. मां. प. मंगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संपादक मंडळाने हे पुस्तक संपादित केले आहे. चव्हाण पुढे म्हणाले, कोणत्याही समाजाने जीवनाच्या मुख्य प्रवाहापासून अलग राहू नये, असा महर्षी शिंदे यांचा प्रघात होता.
“पाणी’ राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर करा
नवी दिल्ली – पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, असे जाहीर करावे म्हणून लोकसभेत आज जोरदार मागणी करण्यात आली. देशातील सध्याच्या वातावरणाचा उपयोग करून घेऊन घटनेत बदल करावा व पाणी राष्ट्रीय संपत्ती जाहीर करावी, असे मत यावेळी सभासदांनी मांडले.
सांस्कृतिक समतेची गरज
सांगली – देशात सांस्कृतिक समतेची आवश्यकता असून हे साध्य करण्यासाठी लेखकांनी ग्रामीण भागात जावे, असे आवाहन सुप्रसिद्ध साहित्यिक व ज्ञानपीठ पुरस्कारविजेते वि. स. खांडेकर यांनी केले.