– अमित डोंगरे
भारतीय संघ परदेशात विशेषतः इंग्लंडला गेला की, तेथील खेळपट्टी पाहिल्यावरच संघातील सलामीवीरांचा रक्तदाब वाढतो असे म्हटले जाते. आताही त्यात फरक पडणार नसल्याचेच दिसत आहे. आजपासून भारत व इंग्लंड यांच्यातील पाच कसेटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला प्रारंभ होत असून, त्यासाठी नॉटिंगहॅममधील ट्रेंटब्रीज मैदानाची खेळपट्टी पाहिल्यावर हिरवे हिरवे गार गालिचे असेच म्हणावे लागेल.
त्यातही भारतीय संघाची फलंदाजीतील ताकद पाहता खेळपट्टीच्या स्वरूपात तसूभरही फरक पडणार नाही असेच दिसत आहे. इतकेच नाही तर भारताच्या पहिल्या पाच फलंदाजांना धावा काढणे तर सोडाच पण खेळपट्टीवर नांगर टाकून उभे राहणेही कठीण कसे केले जाईल यावरच भर दिला जाणार आहे.
सोमवारी खेळपट्टीची पाहणी केल्यावर खेळपट्टीवर भरपूर हिरवळ ठेवली गेल्याचे दिसत होते. आता मंगळवारी ही खेळपट्टी झाकून ठेवली जाणार असून, दव निघून जाऊ नये यासाठी ताडपत्रीच्या खाली बारदानही लावले जाणार नाही हेदेखील उघड आहे. बारदान घातले की दव निघून जाते व पहिल्या एक तासानंतर खेळपट्टी कोरडी होऊ लागते व त्याचा लाभ भारताच्या भक्कम फलंदाजीला होईल, याची भीती यजमानांना स्पष्ट जाणवत असेल.
ही खेळपट्टी तयार करताना जेम्स अँडरसन व कंपनीलाच लाभ व्हावा हाच हेतू ठेवला जाणार आहे. अर्थात त्यात काहीही गैर नाही कारण आपल्या संघात ज्या पद्धतीचे गोलंदाज आहेत त्यांना लाभ व्हावा हा दृष्टिकोन जगातील प्रत्येक कर्णधार ठेवत असतो, त्याला ज्यो रूटही अपवाद नसेल.
आपण तरी काय वेगळे करतो. आपल्या संघात तीन फिरकी गोलंदाज असतात, त्यामुळे सामन्याच्या दिवशी सकाळी खेळपट्टीवरील सर्व गवत काढले जाते व पहिल्याच दिवशी दुसऱ्या सत्रानंतर फिरकी गोलंदाजांना लाभ होईल हे पाहिले जाते. अशा खेळपट्टीवर मोठी धावसंख्या उभारणे अत्यंत कठीण असते.
या परीक्षेत जर कोहली आणि कंपनी उत्तीर्ण झाली तर या हिरव्यागार खेळपट्टीचे बुमरॅंग यजमान इंग्लंडवरच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातही पूर्वीसारखी भारतीय गोलंदाजी केवळ फिरकी गोलंदाजांवर अवलंबून नाही.
आता संघात जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज, इशांत शर्मा व उमेश यादव असे खंदे वेगवान गोलंदाज असल्याने हिरवीगार खेळपट्टी तयार करून इंग्लंड आत्मघात तर करत नाही ना अशी शंका येते. प्रत्यक्ष सामन्यात वरचढ कोण ते कळेलच, पण कोहलीच्या संघाला जगतिक वर्चस्व सिद्ध करायचे असेल तर हा दौरा त्यासाठी पहिली पायरी ठरावा.