पराग शेणोलकर
कराड – महापुरांची दाहकता लक्षात घेऊन क्रेडाई संस्थेने कराडवासियांसाठी अत्याधुनिक रेस्क्यु रबर बोट देऊ केली आहे. ही बोट संस्थेकडेच ठेवली जाणार असल्याचे जाहीर करताच पालिका नवीन बोट घेण्यास सक्षम असल्याचे सांगत मुख्याधिकारी यशंवत डांगे यांनी आपला हेकेखोरपणा दाखवला. पालिका सक्षम होती तर आजपर्यंत किती बोटी घेतल्या? असा प्रश्न उपस्थित होत असून क्रेडाईची बोट वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
नैसर्गिक आपत्ती कोणाला सांगून येत नाही. मात्र, आपत्तीची शक्यता व मागील अनुभवांच्या जोरावर प्रशासन आपत्ती निवारणाचे काम करते. वर्षानुवर्ष येणाऱ्या महापूरात जीवत व वित्तहानी मोठया प्रमाणावर झाली आहे. गेल्या 20 वर्षांचा काळ पाहिला तर 1997, 2005, 2006, 2009, 2016 आणि 2019 साली कृष्णा-कोयनेला आलेल्या महापूरात कराड शहराचे मोठे नुकसान झाले आहे.
महापूरात अडकलेल्या नागरिकांना व त्यांचे संसारोपयोगी साहित्य काढण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्याधुनिक बोटींसाठी कराड पालिका नेहमीच जिल्हा प्रशासनावर अवलंबू राहिली आहे. या काळात कराड पालिकेला मालकीच्या पाच-दहा बोटी घेऊन स्वतंत्र आपत्ती निवारण विभागच पालिकेत डेव्हल्प करावा, असे कधी का वाटले नाही? पूर आला की बोट पाहिजे, एका बोटीवर कसे भागणार? अशा विविध मागण्याला ऊत आल्याचे दिसून आले आहे.
2005-06 या दोन वर्षातील महापूरापेक्षा भयंकर प्रलयकारी महापूर 2019 साली आला. या पूर्वीपासूनच कराड पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून यशवंत डांगे कार्यरत आहेत आणि कराड पालिका आर्थिक सक्षम आहे आणि नवीन बोटी घेण्यासही सक्षम असल्याचा साक्षात्कार झाला नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याउलट 2019 च्या महापुराची दाहकता लक्षात घेऊन कराड इंजिनिअर असोशिएशनची “क्रेडाई’ या संस्थेने पुढाकार घेत आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून कराडवासियांच्या मदतीसाठी अत्याधुनिक सुमारे साडे चार लाख रूपयांची रबर बोट देऊ केली. या बोटीचे नुकतेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
खा. श्रीनिवास पाटील यांनी क्रेडाईच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच ही बोट कृष्णा नदीतून विहार करणार असल्याने त्याचे नाव “कृष्णाई’ ठेवावे असेही सुचविले. यावेळी क्रेडाईच्या अध्यक्षांनी या रेस्क्यु बोटीच्या देखभालीसह ही बोट क्रेडाई संस्थेच्या जागेत ठेवण्यात येणार असल्याची घोषणा केली. तसेच महसूल व पालिकेने मागणी केल्यानंतर बोट दिली जाणार असल्याचेही जाहीर केले. त्यामुळे मुख्याधिकारी डांगे यांचे पित्त खवळले असावे. त्यामुळे त्यांनी सोशल माध्यमावर नाराजी व्यक्त केली.
क्रेडाईने बोट पालिकेस देणार म्हणून आम्हाला बोलावले. मात्र, क्रेडाई बोट त्यांच्याकडे ठेवणार असेल तर ती त्यांनीच चालवावी. पालिकेकडे 2009 पासून बोट आहे. जेथे गरज आहे, तेथे बोट पाठवली जाते. क्रेडाईने पालिकेवर अविश्वास दाखला असून गरज भासल्यास नवीन बोट घेण्यास पालिका सक्षम आहे, अशा पध्दतीने आपला हेकेखोरपणा दाखवून दिला. मुख्याधिकारी डांगे यांच्या या पावित्र्यामुळे क्रेडाईकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महापूराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकीतून कराडवासियांसाठी रेस्क्यु बोट क्रेडाईने घेतली आहे. मान्यवरांसह पालिकेच्या मुख्याधिकारी यांना बोट उद्घाटन कार्यक्रमास निमंत्रित केले होते. तशी निमंत्रण पत्रिकाही देण्यात आली होती. बोट क्रेडाईकडे ठेवायची की पालिकेला सुर्पूद करायची याबाबत संस्था योग्य तो निर्णय घेईल.
धनंजय कदम ,अध्यक्ष, क्रेडाई