सातारा – राज्यातील दिव्यांगांशी चर्चा करुन लवकरच दिव्यांगांसाठी अधिक चांगले धोरण तयार करण्यात येणार आहे. दिव्यांगांना प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या अडचणी येत असून त्या सोडविण्यासाठी या धोरणाचा उपयोग होईल. हे धोरण दिव्यांगांपर्यंत पोहचविण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सातारा जिल्हा असल्याने दिव्यांगांच्या योजना राबविण्यात एक आदर्श जिल्हा निर्माण व्हावा, अशी अपेक्षा दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी येथे व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृहात “दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानांतर्गत दिव्यांग मेळाव्यात श्री. कडू बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा परिषेदचे समाज कल्याण अधिकारी डॉ. सपना घोळवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, दिव्यांग बांधव उपस्थित होते. मंत्रालयात बसून निर्णय घेऊन जमणार नसून सचिवांनी जिल्हा व तालुकास्तरावर येण्याची गरज आहे, असे श्री. कडू यांनी स्पष्ट केले.
शंभूराज देसाई म्हणाले, “”दिव्यांगांना शासनाच्या योजनांचा लाभ सहज मिळावा यासाठी जुन्या व नवीन योजनांमध्ये सुसुत्रता आणण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. दिव्यांगांसाठीच्या विविध घरकुल योजनांचे उद्दिष्ट जिल्ह्याने पूर्ण केले आहे. आता शासनाकडून घरांचा जास्तीचा कोटा वाढवून घेण्यात यईल. प्रत्येक तहसील, प्रांत कार्यालयात दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येईल. त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी उद्योग व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
निराधार योजनेतील दिव्यांगांची प्रकरणे तातडीने मंजूर करण्यात येतील.” “दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांचे कल्याण होईल. दिव्यांगांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यामध्ये वेळोवेळी मेळाव्यांचे आयोजन करावे,’ असे खा. श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. दिव्यांगांसाठी राबविण्यात यणाऱ्या योजनांची माहिती जितेंद्र डुडी यांनी प्रास्ताविकात दिली. दिव्यांगांना धनादेश वाटप, घरकुलाच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. ज्ञानेश्वर खिलारी यांनी आभार मानले.
27 जिल्ह्यांत फक्त तीन पालकमंत्री, एक खासदार
दिव्यांग मेळाव्यासाठी 27 जिल्ह्यांत फिरलो. यादरम्यान तीन पालकमंत्री आणि एक खासदार उपस्थित राहिले असून त्यामध्ये शंभूराज देसाई आणि खा. श्रीनिवास पाटील यांचा समावेश आहे. आज मतांचा विचार करुन राजकारण केले जात आहे. काही पक्षांकडून जाती, धर्माच्या नावाखाली काम सुरु असून फार कमी लोक दिव्यांगांच्या मागण्यांबाबत आग्रही आहेत. कलेक्टर, सीईओ यांचे काम चांगले आहे. त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. मात्र, जे तुमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतील त्यांना मी सोडणार नाही. जिल्ह्यात अद्याप दिव्यांग विभाग अधिकारी पदाची निर्मिती नसल्याची खंत बच्चू कडू यांनी व्यक्त केली.