सध्या नवा करोना विषाणू सर्वत्र थैमान घालतो आहे. चीनमध्ये या विषाणूमुळे सुरू झालेले मृत्युपर्व सर्व जगभर वेगाने पसरते आहे. हा विषाणू नव्याने निर्माण झाल्यामुळे जवळजवळ कुणाकडेही त्याच्यापासून संरक्षण देणारी प्रतिकारशक्ती नाही . त्यामुळेच त्याचा प्रसार वेगाने होतो आहे. हे थांबण्यासाठी परिणामकारक औषधे व लस शोधण्याचे प्रयत्न युद्धगतीने चालू आहेत. ते यशस्वी होतील तेव्हा होतील. पण या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी आपण काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून या लेखातून करोना विषाणूसंबंधी काही अधिकृत मूलभूत माहिती देत आहे.
डॉ. दाक्षायणी पंडित
डॉक्टर ली वेनलियांग हा चीनच्या वुहान शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात काम करीत होता. रुग्णसेवा करताना त्यांच्या लक्षणांवरून त्याला हा कुणीतरी नवा विषाणू असल्याची शंका आली आणि आधी त्याला पूर्वी धुमाकूळ घालून गेलेला सार्सचा विषाणू असावा असे वाटले. पण नंतर मात्र हा सार्सचा विषाणू नसून नावाचं कुणी असल्याचे लक्षात आले. तसे त्याने सांगितले देखील. ते वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्यावर पोलिसांनी त्याला गप्प बसवले. दुर्दैवाने डॉ. ली यालाच त्या विषाणूचा संसर्ग होऊन त्याचा मृत्यू झाला. रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आणि अनेकजण मृत्यूमुखी पडल्यावर मात्र हे प्रकरण साधे सोपे नसल्याची जाणीव होऊन जगभरच्या आरोग्य संघटनांनी त्याची गंभीर दखल घेतली. जागतिक आरोग्य संघटना आणि रोगनियंत्रण संघटना (सीडीसी ) यांनी जगभरातील या विषाणूमुळे किती रुग्ण बाधित झाले आणि किती मृत्यू झाले याचा आढावा घेऊन संरक्षक उपाय जाहीर केले आहेत. ते लेखात पुढे येतीलच.
कोण आहे हा नवा गनिम? हा आला कुठून? असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. करोना विषाणूंचा एक मोठा समुदाय असून ते गाई-म्हशी, उंट, मांजर, खवल्या-मांजर, वटवाघळे अशा अनेक प्राण्यांमध्ये सुखेनैव संसार करीत असतात. कोणत्याही प्रकारे माणसे त्यांच्या संपर्कात आली की हा विषाणू माणसांमध्ये प्रवेश करतो व रोगनिर्मिती करतो. वर्ष 2000 मध्ये सार्स विषाणूने असाच धुमाकूळ घातला होता. नव्या करोना विषाणूची आणि सार्स विषाणूची जनुके यात 80% साम्य आढळून आले आहे. त्यामुळे सार्स विषाणूच थोडे जनुकीय बदल करून नव्या अवतारात प्रगट झाला असण्याचीही शक्यता पडताळून पाहिली जात आहे. करोना विषाणू हा वटवाघळे व खवल्या मांजर यांच्याकडून आला असावा व त्याने या प्राण्यांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात गेलेल्या माणसांना संसर्ग झाला असावा असा आताच प्राथमिक अंदाज आहे.
माणूस हा या विषाणूचे प्राथमिक लक्ष्य नसल्याने माणसात या विषाणूरोधी प्रतिकारशक्ती नसते. त्यामुळे तो बाधित व्यक्तींकडून अबाधित व्यक्तींमध्ये पसरला. साहजिकच बाधित व्यक्तींचे प्रमाण झपाट्याने वाढले व बळींची संख्याही वेगाने वाढली. सध्या विविध कारणांमुळे लोक परदेश प्रवास करीत असल्याने चीनमध्ये कोणत्याही कारणाने मायदेशी परतणाऱ्या लक्षणे नसणाऱ्या व्यक्ती या तो विषाणू आपल्या मायदेशी घेऊन येण्याची शक्यताही वाढली. आता हा विषाणू जागतिक महासाथ निर्माण करण्याची वाढती शक्यता लक्षात घेता जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. चीनकडे प्रवास करण्यावर सध्या तरी कठोर निर्बंध घातले आहेत, तसेच चीनमधून मायदेशी परत येणाऱ्यांना सगळ्यांपासून वेगळे ठेवले जात आहे ज्यायोगे त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होऊ नये.
कोणत्याही संसर्गामध्ये संसर्गकारक जंतुरोधी प्रतिपिंडे तयार होत असतात व ती पुन्हा तोच संसर्ग होण्यापासून वाचवतात. पूर्वीच्या सार्सच्या उद्रेकातून जे वाचले त्यांच्यातील सार्सरोधी प्रतिपिंडे नव्या विषाणूला (त्यांच्यातील जनुकीय साम्यामुळे) त्यांच्यात रोग निर्माण करण्यापासून वाचवीत असावेत अशीही शक्यता शास्त्रज्ञ वर्तवीत आहेत.
याचा प्रवास आधी प्राण्यांकडून माणसाला आणि नंतर माणसाकडून माणसाला होतो. बाधित व्यक्तीच्या फुफ्फुसातून खोकला, शिंका यातून तो हवेत पसरतो व बाधित व्यक्तीच्या आजूबाजूला सहा फुटांपर्यंत असलेल्या सर्वांना त्याचा प्रसाद मिळतो. शिवाय बाधितांच्या हातांना, त्यांच्या आजूबाजूच्या वस्तूंनाही हा विषाणू चिकटतो. त्यामुळे अशा वस्तूंना स्पर्श केल्याने हात-तोंड-नाक असा प्रवास करून विषाणू फुफ्फुसात जातो व रोगनिर्मिती करतो. तरुण व वृद्ध यांना लवकर बाधा होते असे दिसून आले आहे.
लक्षणे – यात ताप, खोकला, दम लागणे, श्वसनास त्रास होणे ही लक्षणे आढळतात. गंभीर रुग्णामध्ये फुफ्फुसदाह (न्यूमोनिया), मूत्रपिंड निकामी होणे इत्यादी गुंतागुंती निर्माण होऊन मृत्यू होऊ शकतो.
उपचार – याला कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. रुग्णाच्या शरीरातील अवयवांचे कार्य नीट चालू राहील एवढेच उपचार करता येतात. पण लक्षणे जास्त दिवस राहिल्यास किंवा तीव्र असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या, दिरंगाई करू नका.
प्रतिबंध- या विषाणूंवर अद्याप लस उपलब्ध नाही. त्यामुळे आज तरी आपल्या रोजच्या जीवनात खालील आरोग्यदायी सवयींचा अवलंब करण्यानेच आपण मोठ्या प्रमाणात स्वतःला वाचवू शकतो .
साबणाने कमीत कमी 10 सेकंद हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवा, विशेषतः लघवीला/शौचाला जाऊन आल्यावर; जेवणापूर्वी; नाक शिंकरणे, खोकणे, शिंकणे इत्यादींच्या नंतर.
साबण व पाणी उपलब्ध नसल्यास ज्यात 50 % अल्कोहोल आहे असे अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरून हात स्वच्छ करा. हात अगदी घाण दिसत असतील तर नेहमी साबण व पाणीच वापरा .
न धुतलेल्या हातांनी डोळे, नाक व तोंड यांना स्पर्श करणे टाळा.
जास्त आजारी असलेल्या व्यक्तीच्या खूप जवळ जाण्याचे टाळा.
तुम्ही आजारी असलात तर घरीच राहा. खोकताना व शिंकताना तोंडासमोर व नाकासमोर टिश्यू पेपर धरा व तो कचऱ्यात टाका.
जास्त वेळा स्पर्श केल्या जाणाऱ्या वस्तू व पृष्ठभाग नियमितपणे पुसून घ्या.
घाबरून जाऊ नका. काळजी घ्या व स्वतःला आणि इतरांना वाचवा.
टाचदुखीमुळे चालणं फिरणं कमी होते, परिणामी व्यायाम कमी होतो आणि वजन वाढू लागते. वाढलेल्या वजनाचा परिणाम सर्व प्रथम टाचांवर होऊ लागतो. म्हणून थोडा व्यायाम नियमित करण्याची सवय ठेवावी.
टाचदुखी ताबडतोब थांबवण्यासाठी सहन होईल इतक्या गरम पाण्यात मीठ टाकून मिनिटे पाय बुडवून बसावे.
फ्रीजशी चक्क कट्टी करावी.
कोल्ड्रिंक किंवा आईसक्रीम फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत घेण्याचे पदार्थ आहेत, असे समजावे.
बर्फ हा शब्द पण उच्चारू नये.
सूर्यास्तानंतर पाणी किंवा थंड पदार्थ घेण्याचे टाळावे.
ए.सी.चा वापर जेथे टाळता येणे शक्य नाही, तेथेच फक्त करावा.
शांतपणे विचार केल्यावर लक्षात येईल की, या गोष्टींचा वापर या सवयी गेल्या काही वर्षात अतिप्रमाणात वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून टाचदुखीची समस्या वाढते आहे.
कित्येक लोकांना रोजचं काम सतत उभं राहून करावं लागतं. भरपूर चालावं लागतं. लोकल पकडायला धावावं लागतं. खेळताना उड्या मारणं, पळणं या गोष्टी आल्याच की. या सगळ्या गोष्टी अधिक कार्यक्षमतेने करण्यासाठी हाडांची मजबुती आवश्यक आहे. तेव्हा टाचदुखी, टेनिस एल्बो, गॉल्फर एल्बो या हाडांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थंडीत सर्वसामान्यपणे याच व्याधी डोकं वर काढतात.
प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात. कुणाला पावसाळा आवडतो तर कुणाला हिवाळा. या आवडीनिवडी वयाप्रमाणे आणि प्रकृतीमानाप्रमाणे बदलत असतात. तरुणपणी गुलाबी वाटणारी थंडी वयोमानाप्रमाणे बोचरी वाटायला लागते. उन्हाळ्यात कमी दुखणारे सांधे हिवाळ्यात जास्त दुखायला लागतात. असं का होतं? तर हिवाळ्यात प्रतिक्षिप्त क्रिया मंदावल्याने इजा होण्याची शक्यताही जास्त अस्ते.
थंडीत त्रास देणाऱ्या मध्यम वयातल्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे टाचदुखी, टेनिस आणि गॉल्फर एल्बो. आणखीही बरेच त्रास थंडीत वाढतात. पण आता आपण या आजारांचा विचार करूया. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही दुखणी जीवघेणी.
टाचदुखी
या आजाराचा सर्वात जास्त त्रास जाणवतो तो सकाळी उठल्यावर. पाय जमिनीला टेकवत नाही आणि आपण टेकवण्याचा प्रयत्न केला तर चांगल्याच कळा मारतात. हे असं का होतं? तर आपल्या पायात सगळ्यात खालच्या हाडापासून ते बोटांना जोडणारा एक पापुद्रा असतो. त्याला इंग्रजीत “प्लांटर फेशिया’ असं म्हणतात. सतत याच्यावर ताण पडून याला टाचेच्या आतल्या भागात तडे पडतात. यालाच “प्लांटर फेशायटिस’ असं म्हणतात. हे भरून यायला वेळ लागतो. त्याच्या आधीच जर आणखी ताण पडला तर बरं न होता हे दुखणं वाढतं.
यावर उपाय म्हणजे सकाळी उठल्यावर पाऊल सर्व दिशांनी फिरवत ताणण्याचा व्यायाम करायचा. आलटून-पालटून गरम आणि गार पाण्याचा पायांना किंवा पर्यायाने टाचांना शेक द्यायचा. नाही तर गरम अथवा गार पाण्यात पाय बुडवून ठेवण्यास काहीच हरकत नाही. तरीही टाचदुखी थांबत नसेल तर डॉक्टर वेदनाशामक गोळ्या देतात. काही जणांना “हील पॅड’ नावाची मऊ गादी बुटांमधे टाचेखाली घातल्यास आराम मिळतो. टाचदुखी असेल तर घरात सपाता घालणं हेही तेवढंच आवश्यक आहे. या सर्व उपायांनीही जर दुखणं कमी झालं नाही तर टाचेत इंजेक्शन द्यावं लागतं.
टेनिस आणि गॉल्फर एल्बो
थंडीच्या दिवसात कोपराच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला दुखतं, कोपरांच्या ठरावीक हालचाली केल्यावर दुखणं वाढतं; तेव्हा रुग्णाला टेनिस किंवा गॉल्फर एल्बोची व्याधी जडल्याचं निदान केले जाते. का बरं हे दुखणं वाढतं? तर हाताच्या स्नायूंवर सतत ताण पडून तडे गेल्याने अशा प्रकारचं दुखणं वाढतं. यावर घरगुती उपाय म्हणजे दुखणाऱ्या भागाखाली एक पट्टी बांधणं. फिजिओथेरपीच्या व्यायामांनीसुद्धा बराच फायदा होतो. या दोन्ही गोष्टींनी आराम न पडल्यास इंजेक्शन आहेच.
हल्ली यावर नवीन उपाय निघाले आहेत. स्टिरॉइडच्याऐवजी पीआरपी म्हणजे “प्लेटलेट रिच प्लाझ्मा’चं इंजेक्शन दिलं जातं. यात रक्तदानाच्या वेळेला रक्त काढून त्यातील काही घटक वेगळे केले जातात. ते घटक दुखणाऱ्या जागी इंजेक्शनच्या माध्यमातून आत सोडले जातात. हे घटक हाताच्या स्नायूंवर सतत ताण पडून गेलेले तडे भरून काढण्याचं महत्त्वाचं काम करतात.
थोडक्यात पण महत्त्वाचं
आपलं शरीर हे वेगवेगळ्या तापमानाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं. सर्व पेशींचे दोन महत्त्वाचे गुणधर्म आहेत. त्यातील पहिला आहे विष्यंदीपणाचा (लवचिकता). आणि दुसरा आहे तन्यतेचा (ताणलं जाण्याची क्षमता). हे दोन्ही गुणधर्म वेळ आणि तापमान या दोन गोष्टीवर अवलंबून असतात. उदाहरणं द्यायचं झालं तर आपण सौम्य प्रमाणात 15 मिनिटं व्यायाम केल्यावर स्नायू अधिक प्रमाणात ताणले जाऊ शकतात.
त्याचा फायदा म्हणजे आपली हालचाल करण्याची क्षमता वाढते. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हालचाली करताना स्नायू फाटण्याची शक्यता खूपच कमी होते. याला शरीर गरम करणं (वॉर्मिंग-अप) असंही म्हणतात. मुख्य व्यायामाच्या आधी किंवा खेळण्याच्या आधी स्नायूंना इजा होऊ नये म्हणून हे अतिशय महत्त्वाचं असतं.
नेमका हाच फायदा थंडीत सौम्य व्यायाम केल्याने आपल्याला होऊ शकतो. ज्यांना आधीपासून टाचा दुखण्याचा किंवा “टेनिस एल्बो’चा त्रास आहे त्यांनी सांधे ताणण्याचे (योगासने) व्यायाम केले तर थंडीत याचा त्रास कमी होतो.
थंडीला सामोर जाण्यासाठी काही गोष्टी या महत्त्वाच्या आहेत. एक तर गरम कपडे घालणं, गरम पेय पिणं, गरम पांघरूण आणि योग्य ऊशी घेऊन झोपणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोज थोडा व्यायाम करणं.
हे केलं तर ठंडी क्या चीज है?