मुंबई : हिंगणघाटमधील दुर्दैवी घटनेतील पीडितेला अखेर आपल्या प्राणाला मुकावे लागले. ती आपल्यातून निघून गेली असली तरी तिच्या मारेकऱ्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. पुन्हा कोणत्या युवतीला अशा दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागणार नाही, अशी अद्दल त्याला घडली पाहिजे.
– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेता
हिंगणघाट जळीतकांड घटनेमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे. आम्ही पिडितेच्या कुंटूंबियांच्या दुखात सहभागी आहोत. या घटनेमुळे महाराष्ट्रातील महिलांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. अशा घटना रोखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जर हे सरकार महिलांच्या विरोधात घडणाऱ्या दुदैर्वी घटनांना रोखण्यात सक्षम नसेल तर राज्यात अराजकता निर्माण होईल.
– प्रविण दरेकर, विरोधी पक्षनेता, विधान परिषद
हिंगणघाटच्या पीडितेच दुःखद निधन झाले, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेतली आहे. महिलांवर ज्याप्रकारे अत्याचार होत आहे, निश्चितच येणाऱ्या काळात नवीन कायदा आणून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल.
– नवाब मलिक, अल्पसंख्याक मंत्री
हिंगणघाटमधील युवतीवर ज्या नराधमाने ही वेळ आणली त्या नराधमाने कडक प्रायश्चित्त करावे, ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. मागच्या काळात अशा गंभीर दोन-तीन घटना घडल्या आहेत, अशा मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे. त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून कडक कारवाई होईल.
– जयंत पाटीला, जलसंपदा मंत्री
हिंगणघाट प्रकरणातील पीडित भगिनींचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. महाराष्ट्र हे माता भगिनींचा सन्मान करणारे राज्य असून समाजातील ही विकृत प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. शासन या पीडित भगिनीला जलद न्याय मिळवून देईल तसेच त्यांच्या कुटुंबियांना मदत उपलब्ध करून दिली जाईल.
– छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री