Sanjay Raut on Rahul Gandhi| राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज धुळे आणि माळेगावात असणार आहे. यावेळी त्यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले असून त्यांची भव्य सभा देखील होणार आहे. यानिमित्त ठाकरे गटाचे नेते संजय राऊत नाशिकमध्ये आले आहेत. तर १७ मार्चला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एकत्र सभा होणार आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधींचं स्वागत करण्यासाठी मी नाशिकमध्ये आलो आहे. त्यांच्या यात्रेतही शिवसैनिक सहभागी होतील. नाशिकमध्ये शालिमार चौकात आमचं कार्यालय आहे. सावरकरांच्या भूमीत राहुल गांधी येतायेत. त्यांचं स्वागत होतंय. भारत जोडो न्याय यात्रेत उद्धव ठाकरे सहभागी होतील. नाशिकमध्ये आम्ही यजमान आहोत. तिथे राहुल गांधींचे स्वागत होईल. १७ मार्चला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एकत्र सभा होणार आहे,” अशी माहिती देत संजय राऊतांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले, “जेव्हा देश, संविधान आणि लोकशाही संकटात असते तेव्हा सगळे मतभेद विसरुन एकत्र यायचं असतं. नाशिक ही वीर सावरकर यांची भूमी आहे. जे आमच्यावर टीका करतात त्या भाजपाच्या लोकांना आम्ही विचारु इच्छितो की १९७८ मध्ये आपण सगळे का एकत्र आला होतात? कारण तेव्हाही देश संकटात आहे अशीच स्थिती निर्माण झाली होती. आताही तशीच परिस्थिती आहे,” असेही संजय राऊत यांनी सांगितले.
मनसेला टोला
वीर सावरकर हा विषय आमच्यासाठी आणि काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. त्या विषयावर राहुल गांधींनी मागच्या वेळी जे बोलले होते त्यानंतर काहीही बोलले नाहीत. मनसेने मुंबईवर जे संकट गुजरात लॉबीकडून येतंय त्यांना बघून घेण्याची भाषा केली पाहिजे. मुंबई गिळली जात आहे. मराठी माणसांवर रोज अन्याय होतोय. शिवसेना लढतेय तो विषय गंभीर आहे. हे कसले फालतू विषय काढत बसला? वीर सावरकर हे आमचे पंचप्राण आहेत आणि राहतील. ज्यांना राहुल गांधी काय बोलतील याची चिंता आहे त्यांनी मुंबई महापालिकेचे टेंडर अचानक गुजराती भाषेत का निघू लागले त्याच्यावर चिंता व्यक्त केली पाहिजे असं सांगत राऊतांनी मनसेला टोला लगावला.
मनसेचा राहुल गांधींना इशारा
राहुल गांधी महाराष्ट्रात येत असून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे त्यांची सभा होणार आहे. पण सावरकरांबद्दल कुठलेही अपशब्द खपवून घेणार नाही. तुम्ही तुमचे म्हणणं मांडा हरकत नाही ,पण सावरकरांबाबत विधान करू नका, असा इशारा मनसेने दिला.