पिंपरी – विवाहितेचा छळ या कलमाखाली गुन्हा दाखल केल्यानंतर बहूतांश जणांचे संसार तुटतात. हे संसार तुटू नयेत म्हणून असा गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलीस आयुक्तालयात तज्ज्ञांकडून पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते. या समुपदेशानातून अनेकांचे तुटणारे संसार वाचले आहेत. मात्र करोनामुळे समुपदेशकांनी पोलीस आयुक्तालयाच्या महिला तक्रार निवारण केंद्राकडे पाठ फिरविली आहे. यामुळे विवाहितेच्या छळाचे गुन्हे थेट दाखल होऊ लागल्याने अनेकांचे संसार तुटू लागले आहेत.
पती आणि पत्नी ही संसाररूपी रथाची दोन चाके आहेत. यापैकी एका चाकाने जरी काम करणे सोडले तरी हा रथ योग्य रितीने पुढे जात नाही. किरकोळ कारणावरून किंवा गैरसमजूतीमधून अनेकांचे संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर असतात. अशावेळी विवाहितेचा छळ हा गुन्हा दाखल केल्यानंतर बहूतांशजणांच्या संसाराला पूर्णविराम मिळतो. असे संसार तुटू नयेत म्हणून गुन्हा दाखल करण्यापूर्वी पती, पत्नी आणि दोन्ही घरातील नातेवाईकांचे पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण केंद्रात समुपदेशन केले जाते.
लॉकडाऊनच्या काळात पती-पत्नी हे दोघेही घरीच होते. त्यातूनच त्यांच्यातील वाद आणखीनच वाढीस लागले आहेत.पोलीस आयुक्तालयात समुपदेशानासाठी येणाऱ्या तज्ज्ञ महिला या कोणतेही मानधन न घेता काम करतात. मार्च महिन्यापासून करोनाचा प्रसार व्हायला सुरवात झाली. तेव्हापासून समुपदेशकांनी पोलीस आयुक्तालयाकडे पाठ फिरविली आहे.
कारण समुपदेशनासाठी येणारी व्यक्ती जर करोना बाधित असेल तर आपल्यालाही त्याची बाधा होईल, अशी भिती समुपदेशकांना वाटत आहे. यामुळे समुपदेशनाचे कामकाज जवळपास ठप्प झाले आहेत. सध्या महिला तक्रार निवारण कक्षाकडे येणाऱ्या तक्रारींवर पोलीस अधिकारी व कर्मचारी समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तज्ज्ञ व्यक्तींच्या आभावी समुपदेशन योग्यरितीने होताना दिसत नाही. यामुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते.