पुणे – करोनाचा संसर्ग आटोक्यात आणायचा असेल सर्व सुरक्षेचे नियम पाळलेच पाहिजेत. घराबाहेर पडण्यावेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ज्यांना सवय नाही, त्यांना सवय लावा, जनजागृती करा वेळप्रसंगी दंडात्मक कारवाई करा. मात्र, कारवाई करणे हा उद्देश नसून स्वत: अणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरणे मुख्य उद्देश आहे, असे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी करोना आढावा बैठकीत सांगितले.
जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानभवन येथे शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसमवेत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी बहुतांश लोकप्रतिनिधींनी नागरिक मास्क वापरत नाही आणि सोशल डिस्टन्सिंगचा नियमही पाळत नाही. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याचे सांगितले. जी व्यक्ती मास्क वापरणार नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून समज द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावर पवार म्हणाले की, दंडात्मक कारवाई हा उद्देश नाही. तर मास्क वापरण्याची सवय व्हावी, हा आहे. जेणेकरून करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यास मदत होईल. यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्वाचे आहे. पुणे जिल्ह्यात करोनाचा संसर्गाचा वेग अधिक आहे. मास्क न वापरल्यामुळे हा संसर्ग आणखी वाढण्याची भीती आहे. त्यामुळे संसर्ग रोखायचा असेल तर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आणि महत्त्वाचे म्हणजे मास्क वापरणे बंधनकारक आहे. परंतु, अनेक नागरिक घराबाहेर पडताना मास्क वापरत नाहीत.
पोलिसांनी किंवा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अडविल्यानंतर “मी बाहेर जाणार नाही, इथेच माझे घर आहे.’ असे म्हणून एवढ्याशा अंतरासाठी कशाला पाहिजे मास्क, या अविर्भावात फिरतात. तर काही तरूण मंडळी वेगवेळी कारणे सांगून मास्क लावणे टाळतात, त्याचा परिणामच संसर्ग वाढीवर होत आहे.