कल्याणी फडके
पुणे – वाहन चालवणे ही बाब पूर्णत: मानवी वर्तनाशी संबंधित असते. त्यामुळे कोणत्याही अपघातानंतर वाहन, रस्त्याच्या विश्लेषणाप्रमाणेच संबंधितांचे वर्तन आणि शारीरिक, मानसिक स्थिती पाहणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. मात्र, याबाबत ठोस उपाययोजना करण्यात येत नाहीत.
केवळ एका ठराविक वेळी किंवा कारणांमध्ये प्रबोधन न करता, सातत्याने वाहनचालकांचे समुपदेशन आणि शिक्षित केले पाहिजे. याशिवाय वाहनचालकांची समक्षता लक्षात घेणे आवश्यक आहे. याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही गरजेची असून, यापूर्वी घडलेल्या अपघातांचा विचार करता प्रशासन याबाबत पावले उचणार का, असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
वाहन चालवण्याच्या पद्धती आणि सरावांवर अनेक गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे वाहन चालवताना अनेकदा गोंधळ होणे, नियंत्रण सुटणे, रस्त्यावरील वाहतुकीचा अंदाज येत नाही. तर नागरी भागातून जाणाऱ्या रस्त्यांवर अवजड वाहनांसाठी असणाऱ्या नियमांमुळे अनेकदा नियमांकडे, वेगमर्यादेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे अपघात घडत असल्याचे निरीक्षण अभ्यासकांनी नमूद केले.
शासकीय वाहनचालकांची चाचणी व्हावी
सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस, एसटी आदी शासकीय वाहनांच्या चालकांना शारीरिक त्रास उद्भवल्यास अपघाताचा धोका अधिक असतो. शासकीय वाहनांच्या चालकांची देखील शारीरिक चाचणी होणे गरजेचे आहे. यामुळे त्यांची सांख्यिकी माहिती देखील संबंधित विभागांकडे राहील आणि ती उपाययोजनांवेळी उपयुक्त ठरेल, असे पेंडसे यांनी नमूद केले.
नियमांकडे दुर्लक्षच
अनेक जण वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. काही चारचाकी वाहनांना सीटबेल्टबाबत सेन्सर असतात. मात्र, अनेक जण वाहन सुरू करताना सीटबेल्ट लावतात, तर काही जण तो “ऍडजस्ट’ करतात. मात्र, यामुळे ज्यासाठी “सेन्सर’ बसवले आहेत, तोच हेतू साध्य होत नाही. केवळ पोलीस दिसल्यावरच नियम पालनाकडे अनेकांचा कल असतो. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधिताचे लायसन्स काही काळासाठी निलंबित करणे किंवा वाढीव दंड आकारणे आदी उपाययोजनांची अंमलबजावणी झाल्यास नागरिकांमध्ये फरक पडण्याची शक्यता अभ्यासकांनी नोंदविले आहे.
वाहन चालवतानाही स्पर्धा !
अपघात घडताना काही गोष्टी मेंदूत घडत असाव्यात आणि यामुळे नियंत्रण जाते, असे म्हटले जाते. अति विचार, ताणतणाव, दिनचर्येतील अस्थिरतेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याशिवाय स्वत:वरचा अतिविश्वास, वाहतुकीला गृहीत धरले जाते. “हू कम फर्स्ट’ ही स्पर्धा आजकाल वाहन चालवताना देखील दिसत आहे. वेग हा अतिशय विलक्षण शब्द असून, सगळ्याच गोष्टी सुसाट हव्या आहेत. मात्र, यातून काय मिळणार किंवा साध्य होणार आहे याचा वाहनचालकांनी विचार करणे गरजेचे आहे.
वाहतूक नियमांबाबतचे प्रबोधन केवळ ठराविक काळापुरते मर्यादित न राहता 365 दिवस याबाबतची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सध्या माध्यमिक वर्गांत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी भावी चालक असल्यामुळे शाळेच्या अभ्यासक्रमात या बाबींचा समावेश होणे गरजेचे आहे. केवळ विद्यार्थीच नव्हे तर, प्रत्येक वाहनचालकाचे सातत्याने समुपदेशन होणे गरजेचे आहे. अपघातांनंतर विश्लेषण आणि चर्चा करण्याऐवजी “क्रॅश ऍनालिसीस’ (तात्काळ विश्लेषण) होवून, अपघातातील मानवी भूमिका लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी महामार्गांवर “आयटीएमएस’ यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे.
– तन्मय पेंडसे, वाहतूक अभ्यासक