पणजी- आम आदमी पक्षाच्या (आप) गोव्यातील सर्व उमेदवारांनी बुधवारी प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. आमदार बनल्यास पक्षबदल करणार नाही आणि कदापि भ्रष्टाचार करणार नाही, अशी हमी त्या प्रतिज्ञापत्रांमधून देण्यात आली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची येथे पत्रकार परिषद झाली. त्यावेळी आपचे सर्व उमेदवार प्रतिज्ञापत्रांसह उपस्थित राहिले. त्या प्रतिज्ञापत्रांविषयीची भूमिका केजरीवाल यांनी स्पष्ट केली. वारंवार घडणारे पक्षबदल ही गोव्याच्या राजकारणाची सर्वांत मोठी समस्या आहे. ती समस्या संपवण्याचा आपचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांच्या प्रती मतदारांमध्ये वितरीत केल्या जाणार आहेत. गोव्यात विधानसभेच्या एकूण 40 जागा आहेत. त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारीला मतदान होईल. गोव्यातील सर्व जागा आप लढवत आहे. मागील निवडणुकीत त्या राज्यात आपला खातेही उघडता आले नव्हते. यावेळी तो पक्ष कशी कामगिरी करणार याविषयी उत्सुकता आहे.