चंडीगढ -करोना विषाणूच्या विरोधातील मुकाबला हा अज्ञात शत्रुविरोधातील युद्धासारखा आहे. तो शत्रू दिवसागणिक आव्हान देत आहे, असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी म्हटले.
जगातील बहुतांश देशांप्रमाणेच भारतालाही करोना विरोधात लढावे लागत आहे. केंद्र सरकारच्या बरोबरीने राज्य सरकारे त्यासाठी पुढे सरसावली आहेत. त्यापार्श्वभूमीवर, पंजाब सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती अमरिंदर यांनी दिली. अनिवासी भारतीयांची मोठी संख्या आणि महिनाभरात परदेशांतून परतलेले नागरिक ही पंजाबमधील प्रमुख समस्या आहे. त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान आमच्यापुढे आहे. ते आव्हान विचारात घेऊन परदेशी प्रवासाची माहिती दडवणाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच घेतला, असे त्यांनी नमूद केले.
करोनाचा थेट मुकाबला करणाऱ्या डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्षणासाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यावर आम्ही भर दिला आहे. अर्थात, सगळीकडेच त्या उपकरणांचा तुटवडा जाणवत आहे. करोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, चाचण्या घेण्यासाठी पुरेशा किट उपलब्ध नसल्याची खंतही अमरिंदर यांनी व्यक्त केली.