नवी दिल्ली : देशात करोना संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पार्शभूमीवर आता वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच करोना काळातील नियमावली आणखी कडक केली आहे.
करोना काळात सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मास्कमुळं करोनाचा प्रसार रोखणे सोपं आहे. यामुळे देशातील एका शहरात मास्कबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क न लावल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे इंदूरमध्ये मास्क अनिवार्य केलं असून नियम न पाळल्यास तुरुंगात जाव लागणार आहे.
इंदूरमधील रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी म्हटलं की, “आपण डेंजर झोनमध्ये आहोत. सावध राहण्याची आवश्यकता आहे. मास्कशिवाय रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांना आता थेट तुरुंगात धाडण्यात येईल. तत्पूर्वी एकाच दिवसांत मास्क न वापरणाऱ्या 2631 बेजबाबदार नागरिकांकडून तब्बल 3 लाख 28 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. इंदूरमध्ये गेल्या 24 तासांत 3305 नमुन्यांची चाचणी करण्यात आली, यातील 309 नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.