सातारा -करोना संक्रमणातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून हे चित्र नक्कीच दिलासा देणारे आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सप्टेंबर महिन्यात करोनामुळे मृत्यू झालेल्या 423 जणांच्या मृतदेहांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. करोनाबाधितांच्या मृत्यूचा गेल्या सहा महिन्यांतील हा सप्टेंबरमधील आकडा उच्चांकी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले आहे .
संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टमार्फत राजेंद्र चोरगे यांनी एकूण अंत्यसंस्कारांची आकडेवारी दिली. त्यानुसार सप्टेंबर महिन्यातील करोनाबळींचा उच्चांकी आकडा समोर आला. सातारा नगरपालिका व बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने गेल्या एप्रिलपासून सहा महिन्यांत सातारा शहरासह तालुका व जिल्हयातील एकूण 1579 पार्थिवांवर कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यामध्ये 720 करोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले. मार्च महिन्यात एकूण 84 अंत्यसंस्कार करण्यात आले त्यामध्ये एकाही करोनाबाधित मृताचा समावेश नव्हता. एप्रिल महिन्यात एकूण 99 अंत्यसंस्कारात तीन पार्थिव करोनाबाधित तर 96 पार्थिव नॉनकोविड होते. संक्रमणाच्या पहिल्या दीड महिन्यात करोनामुळे 17 जणांचा बळी गेला. मे महिन्यात 144 पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.
त्यामध्ये 14 मृत्यू करोनामुळे झाले होते. जून महिन्यात 154 पार्थिवांपैकी 20 करोनाबाधितांवर तर 134 नॉनकोविड पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. जुलै महिन्यात 56, ऑगस्ट महिन्यात 204 तर सप्टेंबर महिन्यात उच्चांकी 423 जणांचा करोनामुळे बळी गेला. या महिन्यात कैलास स्मशानभूमीत 579 पार्थिवांना अग्नी देण्यात आला. 156 जणांचा मृत्यू करोनाशिवाय इतर कारणांनी झाला. मात्र, या महिन्यात तब्बल 78 टक्के करोनाबाधित मृतांचे प्रमाण आढळून आले.
619 जणांचे वय 65 वर्षांच्या वर
करोनाबाधित रुग्णांवर झालेल्या अंत्यसंस्कारांपैकी 75 टक्के मृतदेह सातारा शहर, त्रिशंकू भाग व जवळच्या बारा ग्रामपंचायती वगळून लगतच्या तालुका व जिल्हयातील इतर भागातील होते. गेल्या सहा महिन्यांत करोना संक्रमणाने 720 जणांचा बळी गेला. त्यातील 86 टक्के नागरिक म्हणजे 619 जणांचे वय 65 च्या वर होते. नऊ टक्के नागरिकांचे वय चाळीस ते साठ याच्यादरम्यान होते .