माजी आमदार जोशी यांची टीका
पुणे – हाथरस येथील बलात्काराला बळी पडलेल्या तरुणीच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी शांततामय मार्गाने निघालेल्या खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने दिलेली वागणूक संतापजनक आणि निंदनीय आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
हाथरस येथे खासदार गांधी कर्तव्यभावनेने निघालेले असता कलम 14ची सबब सांगून त्यांना अडविण्यात आले. या कलमाचा भंग न करता ते एकटे पायी निघाले असताना पोलिसांनी त्यांना आडदांडपणे रोखले, धक्काबुक्की केली. हा प्रकार संतापजनक आहे. लोकशाहीमध्ये एखाद्या नेत्याला या पद्धतीने वागणूक देणे ही उत्तर प्रदेश सरकारसाठी शरमेची बाब आहे. या प्रकाराने कॉंग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता संतप्त असून, संवेदनशील नागरिकही अस्वस्थता व्यक्त करीत आहेत.
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात कायदा, सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले दिसतात, असे जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.