मुंबई : राज्यात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यात आज राज्यात कोरोनाने तिसरा बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.
राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘नव्या कोरोना बाधितांची जी संख्या समोर आली आहे. ती ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संसर्गातून झाली आहे. आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे.
कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वांना शिस्तीचे आणि नियमांचे पालन करणे आवाहन करतो, विनंती करतो. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून गरज असेल तरच बाहेर पडा, तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडा, असं आवाहनही बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.