डॉ. शैलेंद्र देवळाणकर
ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधन अहवालात नमूद केल्याप्रमाणे जोपर्यंत करोनावर प्रभावी लस निर्माण होत नाही तोपर्यंत करोनावर 100 टक्के नियंत्रण मिळवणे अवघड आहे. ज्या देशांनी करोनावर नियंत्रण प्राप्त केले म्हणून पाठीवर शाबासकीची थाप घेतली त्या देशांमध्ये पुन्हा एकदा याची लक्षणे दिसायला लागली आहेत. ही सेकंड वेव्ह असून ती धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भारताने यातून धडा घेणे अत्यंत गरजेचे आहे.
14 एप्रिल रोजी पंतप्रधानांनी देशव्यापी लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम राहील असे जाहीर केले आहे. हा निर्णय अत्यंत अपरिहार्य आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)च्या मते, 24 मार्च रोजी लागू केलेला 21 दिवसांचा लॉकडाऊनही अत्यंत सुयोग्य वेळी लागू केला होता. तो लागू करण्यास उशीर झाला असता किंवा केला गेला नसता तर भारतात करोनाच्या रूग्णांची संख्या काही लाखांच्या घरात गेली असती. लॉकडाऊन जाहीर करून ही परिस्थिती येण्याचे संकट टाळण्यात आपल्याला यश आले आहे. युरोपबरोबर तुलना करता भारतात करोना संक्रमणाचा वेग अत्यंत संथ असल्याचे दिसून येते. मुख्य म्हणजे, करोनाचा रिप्रॉडक्टिव्ह रेट एक टक्कापेक्षा कमी ठेवण्यात आपल्याला यश आलेले आहे. हा दर यापेक्षा कमी म्हणजे 0 टक्क्यावर आणायचा असेल तर लॉकडाऊन वाढवणे अत्यंत गरजेचे होते.
जगाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर देशातील लॉकडाऊन हे जगातील प्रवाहाला गृहित धरूनच आहे. मुळात, युरोप, अमेरिका यांच्या तुलनेत भारताने खूप लवकर लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळेच या देशांसारखी महाभयंकर स्थिती आपल्याकडे दिसली नाही. आजघडीला जवळपास 18 देशांनी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामध्ये इटली, स्पेन, ऑस्ट्रेलिया, इस्राईल, जॉर्डन अशा देशांचा समावेश होतो. यातील कोणत्याही देशांनी लॉकडाऊन थांबवलेला नाही; उलट मुदतवाढ दिली. ऑस्ट्रेलियाने तर लॉकडाऊनला सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.
भारताला प्रामुख्याने दोन गोष्टींत समतोल साधायचा आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे करोना विषाणूचा रिप्रॉडक्टिव्ह रेट कमी ठेवणे. याचा अर्थ असा की, एका करोनासंक्रमित व्यक्तीपासून साधारणतः 2-3 लोकांना लागण होत असेल तर हा दर 2 ते 3 टक्के मानला जातो. हा दर 1 टक्कापेक्षा खाली आणायचा आहे. दुसरीकडे, आज पूर्णपणे ठप्प झालेले आर्थिक व्यवहार पुन्हा कसे सुरू करता येतील यामध्ये समतोल साधण्याचे आव्हान हे जगातील प्रत्येक देशापुढे आहेच.
आज इंग्लंडचे उदाहरण घेतले तर तेथेही लॉकडाऊन वाढवायचे की नाही; याबाबत विचार सुरू आहे. युरोपिय देशांमध्ये लॉकडाऊनचे गंभीर आर्थिक परिणाम दिसू लागले आहेत. ब्रेक्झिटमुळे इंग्लंड युरोपियन युनियनच्या बाहेर पडला आहे. युरोपिय देशांना त्यांचे स्वतःचे व्यापारी अस्तित्व आर्थिक प्रगतीच्या माध्यमातून कायम ठेवायचे आहे. त्यामुळे तेथे लॉकडाऊन कायम ठेवण्यावरून मतमतांतरे आहेत. इग्लंडमध्येही लॉकडाऊन काढण्याविषयी विचार सुरू होता. दरम्यानच्या काळात ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक अहवाल आला. त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट नमूद केली होती की जोपर्यंत करोना विषाणूवर लस सापडत नाही तोपर्यंत लॉकडाऊन काढता येणे शक्य नाही; थोड्याफार प्रमाणात लॉकडाऊन ठेवावेच लागणार आहे. त्यसाठी विशिष्ट मुदत नाही. म्हणूनच इंग्लंडने लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. याउलट ज्या देशांनी लॉकडाऊन जाहीर करण्यास उशीर केला अशा अमेरिका आणि इटली या दोन देशांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत.
आज अमेरिकेची अवस्था अत्यंत गंभीर आहे. तथापि आता कुठे न्यूयॉर्कमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. अजूनही संपूर्ण अमेरिकेत लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला नाही. तेथे संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या सहा लाखांपर्यंत गेली आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जवळपास 20 हजारांच्या पुढे गेली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. अमेरिकेचे लष्करही त्यापासून वेगळे राहू शकलेले नाही. अमेरिकन लष्करातील 3 हजार लोक करोना विषाणूने बाधित आहेत. एवढेच नव्हे तर अमेरिकेच्या अण्वस्त्रांच्या सुरक्षिततेचा धोका निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत ज्या देशांनी लॉकडाऊन उठवले होते, ज्यांच्याकडे करोना विषाणूची परिस्थिती सर्वसामान्य झाली तेथून काही नकारात्मक बातम्या येत आहेत.
आज चीनमधून करोनावर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित केले आहे अशा बातम्या, व्हिडिओ समोर येत आहेत. करोनाचे उगमस्थान असणाऱ्या वुहानमधील दैनंदिन व्यवहार सुरळित सुरू झाले आहेत. रेल्वे सुरू झाल्या आहेत, टुरिस्ट पॉइंट सुरू झाले आहेत. दक्षिण कोरिया, जपान, हॉंगकॉंग आणि तैवान याही देशांनी यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला होता. परंतु तेथे करोनाच्या केसेस नव्याने पुन्हा सापडत आहेत. याला करोनाची सेकंड वेव्ह किंवा दुसरी लाट म्हटले जाते. यामुळे चीनचे धाबे दणाणले आहेत. अर्थात, चीन खरी आकडेवारी कधीच सांगणार नाही; परंतु चीनकडून अधिकृत जे वृत्त हाती आले आहे त्यानुसार तेथे 950 नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. हा आकडा लहान नाही.
चीनच्या म्हणण्यानुसार जे चिनी नागरिक देशाबाहेर अडकलेले होते त्यांना आम्ही परत बोलवले तेव्हा ते करोनाग्रस्त आढळले आहेत. म्हणजेच नवे रूग्ण स्थानिक नागरिक नाहीत. त्यामुळे चीनने संपूर्ण लॉकडाऊन न करता काळजी घ्यायला सुरुवात केली आहे. दक्षिण कोरियानेदेखील ट्रेस, टेस्ट, ट्रीट ही त्रिसुत्री आणि डिजिटल ट्रॅकिंग सिस्टिमच्या माध्यमातून कमालीचे नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले होते. तेथे करोनाबाधितांची प्रतिदिन संख्या 30-40 पर्यंत खाली आली होती; परंतु आता ती 100ने वाढताना दिसत आहे. हाच प्रकार जपान, फिलीपिन्स, सिंगापूर, हॉंगकॉंग, तैवानमध्येही दिसून येतो आहे. जपानमध्ये बरे झालेल्या अनेक लोकांमध्ये करोनाची लक्षणे पुन्हा दिसत आहेत. यावरून एक गोष्ट निश्चित होते की करोनावर 100 टक्के नियंत्रण मिळवणे अवघड आहे.
भारतात रिप्रॉडक्शनचा दर 1 टक्कापेक्षा खाली ठेवण्यासाठी आपल्याला सामाजिक अंतर राखण्याचा मूलभूत उपाय कठोरपणाने अमलात आणावा लागेल. तसेच द. कोरियाप्रमाणे आपल्याला पुन्हा ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट तसेच डिजिटल ट्रॅकिंगसारखे मॉडेल वापरावे लागतील.