नवी दिल्ली – भारतात सध्या निर्माण झालेला करोनाचा प्रादुर्भाव येत्या काही आठवड्यात मंदावण्याची शक्यता आहे. पण येत्या पावसाळ्यात म्हणजे जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला ही साथ पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्भवू शकते असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की लॉकडाऊनची मुदत संपल्यानंतर कशी काळजी घेतली जाते त्यावर या दुसऱ्या साथीची तीव्रता अवलंबून असेल. शिवनाडर विद्यापीठातील एक प्राध्यापक समीत भट्टाचार्य यांनी सांगितले की, सध्या करोनाचा प्रादुर्भाव कळसावर पोहचला असून त्यात आता काही प्रमाणात घटही दिसून येईल. पण त्यानंतर पुन्हा या करोनाचा दुसरा फेराही येत्या काही महिन्यात पुन्हा उद्भवू शकतो.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै अखेरीला किंवा ऑगस्टच्या सुरूवातीला हा दुसरा फेरा येऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चमधील एका तज्ज्ञांनी सांगितले की, लॉकडाऊन उठल्यानंतर आज जेव्हा आपले नियमीत व्यवहार सुरू करू त्यावेळी करोनाची लागण पुन्हा मोठे स्वरूप धारण करू शकते. सध्या चीनला हा धोका जाणवू लागला आहे.
चीन आणि युरोपातील काही केसेस पाहिल्यानंतर जे करोनातून बरे झाले आहे त्यांनाच पुन्हा या रोगाने ग्रासल्याचीही अनेक प्रकरणे आढळून आली आहेत.यातून एक दिसून आले आहे की पहिल्यांदा करोनाची लागण झाल्यानंतर आणि पेशंट त्यातून बरा झाल्यानंतर त्याच्यात करोना विषाणूंना प्रतिक्रार करण्याची क्षमता निर्माण होते या दाव्यात तथ्य नाही. या पार्श्वभूमीवर आयआयएससी, आणि टीआयएफआरच्या संशोधकांनी म्हटले आहे की, करोनाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्बंध अजूनही काही काळ लागूच ठेवण्याची गरज आहे.