करोना नावाच्या व्हायरसमुळे जगात महामारीचे संकट आणले. त्याचा सामना करताना सर्वच आस्थापना चिंतीत आहेत. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून दैनिक प्रभातमधील प्रतिक्रिया वाचून सद्यस्थितीत नगरकरांचे काय म्हणणे आहे, ही बाब समोर आली.
त्याबद्दल प्रथमता दैनिक प्रभातला धन्यवाद. करोनाच्या या महामारीत ज्याप्रमाणे वैद्यकीय यंत्रणा व पोलिसांनी भीतीदायक वातावरणात काम केले. त्याचप्रमाणे पेट्रोल पंपचालक व पंपांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही महत्वाची भूमिका बजावली. कुणाला पेट्रोल, डिझेल द्यावे व कुणाला देऊ नये, या संदर्भातील आदेशाचे आम्ही तंतोतंत पालन केले. मात्र, हे करताना पंपावरील कर्मचारी मेटाकुटीला आलेत.
अनेकांनी तर कर्मचाऱ्यांशी हुज्जत देखील घातली. आताही सर्वांनाच मास्क बंधनकारक असताना अनेक ग्राहक विनामास्क पंपावर येत आहेत. त्यांना मास्क घालण्याचा आग्रह केल्यास ते कर्मचाऱ्यांवरच चिडतात. करोनाचा या संकटाचा सामना करताना सर्वांच्याच सहकार्याची गरज आहे. मात्र, तरीही विनाकारण लोकांचा रोष सहन करावा लागत आहे.
पंपावर येणाऱ्या ग्राहकांनी रोखीचे व्यवहार टाळायला हवेत. डेबिट कार्ड, पेटीएम किंवा अन्य साधनांचा उपयोग करता येईल. रांगेत आणि ठराविक अंतर सोडूनच उभे राहण्याचा कर्मचाऱ्यांचा आग्रह सन्मानाने स्वीकारावा. पेट्रोल पंपावर काम करणारा आपलाच बांधव, भगिनी पहाटे पाचपासून सेवेत आहे, याचा विचार करावा. त्यालाही परिवार आहे. त्यालाही भावना आहेत, हे का समजून घेत नाहीत.
अनिल जोशी, संचालक, दीपक पेट्रोलपंप, नगर. संपर्क: 9561151555
करोनामुळे 22 मार्च 2020 ही तारीख सर्वांच्याच लक्षात राहिल. या दिवशी करोना नावाच्या आजाराचा लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या तोंडी गजर झाला. त्यामुळे सर्वच जण एकमेकांचे हेवेदावे, मत्सर, राग-लोभ, तसेच राजकारण बाजुला ठेवऊन “करोना हटाव’ या एकाच घोषणेची पूर्ती करण्यासाठी सरसावले. यात आमचे सावेडीकर मागे नसल्याचेही दिसून आले.
25 मार्चला गुढी पाडव्याची गुढी उभारण्याचा कार्यक्रम घरोघरी अत्यंत साधेपणाने झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल्या आवाहनानुसार सावेडी व परिसरातील बहुतांशी नागरीकांनी आपापल्या घरात राहणेच पसंत केले. भाजीबाजार, मेडिकल व दूध केद्रांवर 1 मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवूनच खरेदी केली. त्यातून पोलिसांचा ताण कमी करण्याचा प्रयत्न केला.
दिनांक 24 मार्च 2020ला सावेडीतील ज्येष्ठ नागरीक मंचतर्फे “ज्येष्ठराज’ अंकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय कळमकर यांच्या हस्ते होणार होता. तथापि, नियमांचा भंग होऊ नये, म्हणून हा कार्यक्रम त्वरीत स्थगित करण्यात आला. ज्येष्ठ नागरीकांनी व्हाटस ऍप गृपवर कोणत्याही प्रकारे राजकीय लेख टाकण्यात येऊ नयेत, तसेच कुणाकडून गैरलागू लेख, विचार, त्यावर आल्यास तो त्वरीत डिलिट करुन फॉरवर्ड केला जाणार नाही, याची खबरदारी घेतली. थोडक्यात सर्वांनीच “करोना हटाव’चा चांगला चंग बांधला आहे. घरात राहून हे युद्ध आपण नक्कीच जिंकू.