पुणे – करोना लसीबद्दल केंद्र सरकारकडून सकारात्मक स्थिती निर्माण करण्यात येत असली, तरी प्रत्यक्षात लस येण्यासाठी दोन-तीन महिन्यांचा कालावधी आवश्यक आहे. कारण, परिणामकारक लस मिळण्यासाठी विविध टप्प्यांतून जावे लागते. आज आपल्याकडे लस साठवण्यासाठी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे लस उशिरा आली तरी चालेल, पण ती सुरक्षित यावी. लस आणण्यासाठी घाई अयोग्य आहे,” असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केले.
करोनामध्ये जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणाऱ्या वैद्यकीय, पोलीस, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील सेवाव्रतींना परभन्ना फाउंडेशनच्या वतीने कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. गणेश चप्पलवार यावेळी उपस्थित होते.
आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने, औंध जिल्हा रुग्णालयातील डॉ. सचिन चप्पलवार, अमोल काळे, ऍड. वाजेद खान यासह अन्य योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाचाही सन्मान करण्यात आला.
धारिया म्हणाले, “मानवसेवा ही ईश्वरसेवा आहे. धर्म, जातीभेद विसरून लोकांनी या काळात समाजसेवा केली. गरजूंना, वंचितांना मदतीचा हात वनराईसह इतर अनेक संस्थांनी, व्यक्तींनी दिला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. गणेश चप्पलवार यांनी प्रास्ताविक, अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन तर विजय गायकवाड यांनी आभार मानले.